
अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
जबरदस्तीने रस्ता लादणाऱ्या तहसीलदारांवर कारवाईची मागणी
सासवडला १९ जानेवारी पासून आंदोलन
सासवड: पुरंदर तालुक्यातील आंबोडी येथे महार वतनाच्या जमिनीतून काही गुंतवणूकदारांनी प्रशासनाकडे रस्ता करावी अशी मागणी केली होती. यामध्ये प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात घेवून आणि स्थळ पाहणी करून निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र अर्थपूर्ण तडजोडीतून ठराविक शेतकऱ्यांच्या जमिनीतून थेट रस्ता तयार करण्याचे आदेश दिल्याचा आरोप केला केला आहे. दरम्यान प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात संबंधित पुरंदरमधील शेतकऱ्यांनी १९ जानेवारी पासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. विशेष म्हणजे आंदोलन सुरु करून १५ दिवसांचा कालावधी होवूनही प्रशासनाकडे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
आंबोडी येथील प्रकाश रणपिसे, चंद्रकांत रणपिसे, अशोक रणपिसे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी पुरंदर प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे. आर्थिक तडजोडीतून परस्पर निर्णय दिल्याबद्दल तहसीलदार विक्रम राजपूत आणि सासवडचे मंडलाधिकारी सुहास कांबळे यांची खाते निहाय चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी विभागीय आयुक्तांना केली आहे.
याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले कि, आंबोडी येथील इनाम वर्ग ६ ब, महार वतन वर्ग दोन ची शेतजमीन गट नंबर १३१, १३२, १३८, १३९, १४०, १४१, १४२, १४३, १४४, १४५, १५६, १४७ आणि १४८ मधून बबन शंकर रणपिसे आणि राहीबाई धाकू गजरे यांच्या वतीने सुवर्णा गायकवाड तसेच अन्वर बाबूलाल शेख यांनी पुरंदरच्या तहसीलदारांकडे मागणी केली होती. मात्र यातील बबन शंकर रणपिसे यांची अर्जावर सहीच नाही अथवा आतापर्यंत कोणत्याही प्रक्रियेत त्या तहसील कार्यालयाकडे फिरकल्या देखील नाहीत. राहीबाई धाकू गजरे या मयत असून त्यांच्या वतीने मागणी करणारे सुवर्णा गायकवाड यांचे कोणत्याही सातबारा उतारावर साधे नाव देखील नसल्याने त्यांचा रस्त्याची मागणी मारण्याचा अधिकारच नाही. आणि त्यांची कोणत्याही अर्जावर साधी सही देखील नाही.
Purandar Taluka Elections: पुरंदर पंचायत निवडणुकीचा रणसंग्राम तापला; चारही गटांत थेट लढती
त्याचप्रमाणे रस्त्यासाठी मागणीचा अर्ज करणारे अन्वर बाबूलाल शेख हे आंबोडी येथील मूळ रहिवासी किंवा खातेदारही नाहीत. अन्वर यांनी २०१९ मध्ये गट नंबर १४१ हि महार वतनाची जमीन घेतलेली असून खरेदी दस्तामध्ये पूर्वेस कुंभारवळण शिवरस्ता असा उल्लेख असल्याचे दिसून येत आहे. मात्र शेख यांनी शिव रस्त्याचा वापर न करता केवळ आमच्याच जमिनीतून रस्ता करण्याचा हट्ट का धरला आहे ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच गट जमीन १४१ मध्ये क्षेत्र असताना पुढील क्षेत्रातून रस्ता करण्याची केलेली मागणी चुकीची आहे. जिथे क्षेत्र नाही तिथे रस्त्या करण्याची तुम्हाला गरज काय आहे ? त्यामुळे यामध्ये प्रशासनाने स्थळ पाहणी न करता केवळ मागणीच्या आधारे रस्त्याला परवानगी दिलेली आहे.
पुरंदरमधील रस्त्यांवर गतिरोधकांची गरज; सायकल स्पर्धेनंतर वाहनांचा वेग वाढला
वास्तविक पाहता एखाद्या अर्जदाराने रस्त्याची अथवा कोणत्याही कामाची मागणी केल्यास संबंधित क्षेत्रातील व्यक्तींशी प्रशासनाने समोरासमोर बोलणे आवश्यक होते. मात्र अन्वर शेख यांनी आमच्याशी कोणतीही चर्चा न करता तहसीलदार यांच्याकडे मागणी केली. तसेच तहसीलदारांकडून पाठवलेल्या सर्व नोटीस आम्हाला मिळणार याचीही काळजी घेतल्याने आम्हाला कोणतीही नोटीस मिळाली नाही. आणि त्यातूनच हा निर्णय घेतला आहे. यामध्ये तहसीलदार विक्रम राजपूत यांच्यासह नोटीस पाठवून परस्पर गायब करणारे मंडलाधिकारी सुहास कांबळे यांनी संगनमताने मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोड करून आमच्या विरोधात परस्पर निकाल दिला आणि रस्ता करण्याचा आदेश मिळवला आहे. मात्र आम्हाला या रस्त्याची कोणतीही गरज नसून आमचे १२ फुट रुंदीचा रस्ता केल्याने मोठ्या प्रमाणात क्षेत्र जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाने रस्त्याचा दिलेला आदेश पाठीमागे घ्यावा अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे.