
Raigad News: महाडकरांना मोठा दिलासा! कोथिंबिरीची आवक वाढली, दर थेट १० रुपयांवर
महाडच्या किरकोळ भाजी बाजाराची पाहणी केली असता, बहुतांश ठिकाणी ताजी, हिरवीगार कोथिंबीर दहा रुपयांना एक गड्डी या दराने विक्रीस उपलब्ध असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी दर्जानुसार दहा रुपयांना दोन गड्ड्यांचीही विक्री होत असल्याने ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दर घसरल्याने कोथिंबिरीची विक्री वाढली असून विक्रेतेही “कोथिंबीर घ्या कोथिंबीर ताजी कोथिंबीर।” अशा मोठमोठ्याने आरोळ्या देत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चढाओढ करताना दिसत आहेत. बाजारपेठेत दिवसभर या हाका घुमत असल्याने भाजी बाजाराला एक वेगळीच रंगत आली आहे.
कोथिंबीर ही दैनंदिन स्वयंपाकातील अत्यावश्यक भाजी असल्याने दर कमी होताच ग्राहकांनीही खरेदीचा ओघ वाढविला आहे. गृहिणींसह हॉटेल व्यावसायिक आणि खानावळ चालकही आता अधिक प्रमाणात कोथिंबीर खरेदी करत असल्याचे चित्र आहे. विक्रेत्यांच्या मते, पुढील काही दिवस अशीच आवक कायम राहिल्यास कोथिंबिरीचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.
भाजी विक्रेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांत राज्यातील उत्पादन घटल्यामुळे स्थानिक बाजारपेठा मोठ्या प्रमाणावर परराज्यातून येणाऱ्या कोथिंबिरीवर अवलंबून होत्या. वाहतूक खर्च, मर्यादित आवक आणि मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा यामुळे कोथिंबिरीचे दर तीस ते पन्नास रुपयापर्यंत पोहोचले होते. मात्र आता राज्यातील विविध भागांत नव्या हंगामातील पीक बाजारात येऊ लागल्याने आवक लक्षणीय वाढली आहे. त्यामुळे बाजारातील पुरवठा वाढून दरात मोठी घसरण झाली आहे.
काही महिन्यांपूर्वी ‘हिरवे सोने’ ठरलेली कोथिंबीर आता पुन्हा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली असून, महाडच्या बाजारपेठेत घसरलेल्या दरामुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि विक्रेत्यांच्या आवाजात पुन्हा एकदा उत्साह परतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.