
तीन दिवसांपासून नेरळचा वीजपुरवठा खंडित; महेंद्र थोरवे मैदानात, अधिकाऱ्यांना फटकारले
नव्याने उप विभागीय कार्यालय स्थापन होऊन कामकाज सुरू झालेल्या नेरळ मध्ये गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित आहे. नेरळ गाव आणि परिसर तीन दिवसापासून विजेअभावी अंधारात असल्याने वीज ग्राहकांचे प्रचंड हाल झाले आहेत.आज संतप्त वीज ग्राहक यांनी सकाळी थेट महावितरण कार्यालय गाठले.नव्याने निर्माण झालेली सहाय्यक अभियंता कार्यालयावर धडक देत आपला संताप व्यक्त केला. या प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक वीज ग्राहक यांच्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी आमदार थोरवे यांनी महावितरणच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले आणि अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
NEET पेपरफुटीविरोधात कर्जत पेटलं! धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थ्यांचा एल्गार !
नेरळ गाव आणि परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला असून पुरवठा देखील कमी दाबाने होत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत आमदार थोरवे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नेरळ गाव आणि परिसरातील वीज सुरळीत होत नाही तोवर महावितरणच्या एकाही अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने घरी जायचे नाही. तसेच, कर्जत चे उप अभियंता चंद्रकांत केंद्रे यांना नेरळ मध्ये येऊन तत्काळ सर्व माहिती घ्यावी आणि उपाययोजना करावी अशी सूचन केली. वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांनी नेरळ सोडायचे नाही असे निर्देश आमदार थोरवे यांनी दिले.
आमदारांच्या या आक्रमक भूमिकेनंतर महावितरण कामाला लागले असून आजच नेरळ आणि नेरळ परिसरात वीजपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.यावेळी माजी सभापती अमर मिसाळ,शहर शिवसेना शाखेचे किसन शिंदे, विशाल साळुंखे, वीज ग्राहक समितीचे रंजन दातार ग्रामपंचायत माजी सदस्य आदी उपस्थित होते.