
Raigad News: पनवेलमध्ये पावसाळी पर्यटन ठरतंय जीवघेणं! यंदा 5 जणांचा मृत्यू, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
यंदाच्या पावसाळ्यात पांडवकडा येथे दोन, गाडेश्वर धरण परिसरात दोन आणि भोकरवाडी परिसरात एका व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनांमुळे संपूर्ण परिसर हादरला असतानाही सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक धोकादायक ठिकाणी जात असल्याचे चित्र कायम आहे. अनेकजण जीव धोक्यात घालून खोल पाण्यात उतरतात, कड्यांवर चढून छायाचित्रे व चित्रफिती काढतात आणि प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात.
प्रशासनाकडून धोक्याचे फलक, काही ठिकाणी बॅरिके अधूनमधून बंदोबस्ताची आणि पोलिस व्यवस्था केली जाते, मात्र गर्दीच्या तुलनेत ही व्यवस्था अपुरी असल्याची टीका स्थानिक नागरिकांकडून होत आहे. अनेक ठिकाणी प्रशिक्षित बचाव पथक, सीसीटीव्ही यंत्रणा, ध्वनिक्षेपकाद्वारे सतत सूचना, जीवनरक्षक साहित्य आणि कायमस्वरूपी सुरक्षा कर्मचारी नसल्याचे दिसून येते.
स्थानिकांच्या मते, प्रत्येक दुर्घटनेनंतर काही दिवस प्रशासनाकडून कडक कारवाई व गस्त घालण्यात येते, मात्र काही दिवसांनी परिस्थिती पूर्ववत होते. त्यामुळे धोकादायक ठिकाणी पुन्हा मोठी गर्दी होऊन जीवितहानीचा धोका वाढतो. केवळ इशारा फलक लावून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही, तर धोकादायक भागात प्रवेशबंदी, कठोर अमलबजावणी आणि नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनीही स्वतःची जबाबदारी ओळखण्याची गरज आहे. मद्यप्राशन करून पाण्यात उतरणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे किंवा बंदी असलेल्या भागात प्रवेश करणे हे अनेक दुर्घटनांचे कारण ठरत आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रभावी सुरक्षा व्यवस्था उभारण्याबरोबरच पर्यटकांनीही नियमांचे पालन केल्यास अशा दुर्घटनांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकते.