धर्मेंद्र प्रधानांनंतर आता नितीन गडकरी टार्गेटवर? उद्धव ठाकरेंच्या एका वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून आता कॉकरोच जनता पार्टीचा पुढचा निशाणा कोण असणार, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील ‘तिरंगा’ रॅलीत केलेल्या वक्तव्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी संघटना आणि कॉकरोच जनता पार्टी (CJP) यांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यानंतर देशभरात विद्यार्थी आंदोलकांकडून एकाच जल्लोष करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्क येथे ठाकरे बंधूंकडून ‘तिरंगा’ रॅलीचे आयोजन आज (रविवार, 26 जुलै) करण्यात आले होते. yअवेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात नितीन गडकरी यांचा उल्लेख करत त्यांना सुरुवातीला “खड्डामंत्री” असे संबोधले. त्यानंतर त्यांनी लगेच दुरुस्ती करत “केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी” असा उल्लेख केला. त्याचवेळी इथेनॉलच्या मुद्द्यावर पुढील काळात मोठी चर्चा होईल, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
उद्धव ठाकरे यांनी याच भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावरही टीका केली. त्यांच्या वक्तव्यामुळे विरोधक आगामी काळात केंद्र सरकारच्या विविध धोरणांवर अधिक आक्रमक भूमिका घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
‘देर आए दुरुस्त आए’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्याच ज्येष्ठ नेत्याचा घरचा आहेर,
दरम्यान, इथेनॉल मिश्रित इंधनाचा मुद्दा यापूर्वीही राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला होता. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवल्यामुळे काही वाहनधारकांनी इंजिनच्या कार्यक्षमतेबाबत तक्रारी केल्याचे समोर आले होते. यावर नितीन गडकरी यांनी पर्यावरणपूरक इंधनाचा वापर वाढविण्याच्या धोरणाचे समर्थन केले होते. तसेच, इथेनॉलविरहित इंधनाची मागणी असल्यास त्यासाठी अधिक किंमत मोजावी लागू शकते, असेही त्यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते.
या वक्तव्यांनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. इथेनॉल धोरण, पर्यायी इंधन आणि वाहन क्षेत्रातील बदल यावरून मोठी चर्चा रंगली होती. आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा हा मुद्दा उपस्थित केल्याने इथेनॉल धोरणावरून केंद्र सरकारवर विरोधकांचा दबाव वाढू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Big Breaking: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय; आता ‘हा’ नेता असणार देशाचा शिक्षण मंत्री
दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रीय राजकारणात नवीन समीकरणांची चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे नितीन गडकरी पुन्हा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. आगामी काळात विरोधक कोणत्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावर केंद्र सरकारची काय भूमिका राहते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






