कवयित्री, समाज कार्यकर्त्या सौ. अश्विनी सचिन बोलके यांच्या ‘शब्द माझे तुझ्याचसाठी’ या काव्यसंग्रहाचे आणि निवेदक, गायक अभियंता कवी मयूर महादेव पालकर यांच्या ‘मयूरस्पर्श’ चारोळी संग्रहाचे प्रकाशन अभियंता भवन नवीन पनवेल येथे ज्येष्ठ साहित्यिक – सुप्रसिद्ध गझलकार ए.के. शेख तसेच प्रमुख मान्यवर म्हणून अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत अध्यक्ष – ज्येष्ठ पत्रकार श्री. दुर्गेश सोनार, कवयित्री, शिक्षिका सौ.मानसी नेवगी, साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे आणि सबोर्डीनेट इंजिनीअर असोशिएशनचे अध्यक्ष संजय ठाकूर अशा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
“मनास होणारा भावनांचा तरल स्पर्श म्हणजे मयूरस्पर्श”
“मनास होणारा भावनांचा तरल स्पर्श म्हणजे मयूरस्पर्श”, अशा शब्दांत कवयित्री मानसी नेवगी यांनी चारोळीकार मयूर पालकर यांच्या ‘मयूरस्पर्श ‘ विषयी आपले मनोगत व्यक्त केले.जेष्ठ साहित्यिक आणि सुप्रसिद्ध गझलकार सन्माननीय ए. के . शेख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कवयित्री अश्विनी बोलके आणि कवी मयूर पालकर यांच्या साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि ‘शब्द माझे तुझ्याचसाठी’ आणि ‘मयूरस्पर्श’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले असे जाहीर केले. उत्तोमत्तम कथा कवितासंग्रह निर्माण करणाऱ्या साहित्यसंपदा प्रकाशनची ही दोन्ही पुस्तके आहेत.
कविता सकस, सशक्त आणि सामर्थ्यशाली आहेत
दुर्गेश सोनार यांनी कवयित्री अश्विनी बोलके यांच्या ‘शब्द माझे तुझ्याचसाठी’ या पुस्तकाबद्दल,”या काव्यसंग्रहातील कविता सकस, सशक्त आणि सामर्थ्यशाली आहेत तसेच हा काव्यसंग्रह असला तरी संपूर्ण पुस्तक वाचून पूर्ण व्हायला दोन ते तीन महिने लागू शकतात,इतक्या त्या विचार करायला लावणाऱ्या आहेत.” असे मत व्यक्त केले.
“दोन्ही पुस्तकांच्या शेकडो आवृत्त्या प्रकाशित होवोत”
सौ. पल्लवी काळे यांनी अश्विनी बोलके यांच्या काव्यसंग्रहातील ‘ऋणानुबंध’ या कवितेचे वाचन केले. शब्दशिल्प कलाविष्कार संघ सर्वेसर्वा हिरकणी गीतांजली वाणी यांनी “दोन्ही पुस्तकांच्या शेकडो आवृत्त्या प्रकाशित होवोत” अशा शुभेच्छा दिल्या व मयूर पालकर हे आधुनिक युगातील परिपक्व कवी आहेत, भविष्यात त्यांच्या साहित्यिक संपदेची खास आवड असणारे वाचक असतील असे त्या म्हणाल्या.
शिक्षिकांना ‘शिक्षक रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
शुभंकरोती साहित्यिक संस्था संस्थापक कवयित्री सोनाली जगताप यांनी दोन्ही पुस्तके आवर्जून वाचण्यासारखी आहेत असे सांगितले तर कवयित्री प्रियांका कोठावदे, रजनी येवले यांनी मयूरस्पर्श मधील काही चारोळ्यांचे वाचन केले. साहित्य संपदा संस्थेतर्फे शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या शिक्षिकांना ‘शिक्षक रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता हर्डीकर यांनी केले. सचिन बोलके ह्यांनी आभार प्रदर्शन केले.
पनवेलमध्ये अश्विनी बोलके यांचा कवितासंग्रह आणि मयुर पालकर यांच्या चारोळी संग्रहाच्या प्रकाशनानिमित्त शहरातील साहित्यविश्व एकत्रित झाले होते. सर्व साहित्यातील रुची असणाऱ्या लोकांची एक छान मैफिलच यानिमित्ताने रंगली होती.