Ramdas athavle reaction on neelam gorhe statement in indapur
इंदापूर : दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यामुळे राजकारण रंगले होते. दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये केलेल्या वक्तव्यावरुन राजकारण रंगले आहे. ‘त्यांनी किती मर्सिडीज गाड्या दिल्या आहेत, हे माहीत नाही,परंतू काहीतरी वक्तव्य करुन एका महिलेचा अपमान करणे योग्य नाही अशा शब्दांत नीलम गोऱ्हे विरुध्द संजय राऊत प्रकरणासंदर्भात दोघांना ही फटकारणारी प्रतिक्रिया केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सोलापूरहून मुंबईकडे जाताना सोमवारी (दि.२४) सायंकाळी रामदास आठवले हे काही काळ येथील शासकीय विश्रामगृहात थांबले होते. तेथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तत्पूर्वी रिपाइंचे पुणे जिल्हा प्रभारी विक्रम शेलार,जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे,तालुका युवकचे अध्यक्ष संदेश सोनवणे,शहराध्यक्ष अमोल मिसाळ, नितीन झेंडे, भाजपचे किरण गानबोटे,राष्ट्र सेवा दलाचे रमेश शिंदे,हनुमंत कांबळे,संदिपान कडवळे,अरविंद वाघ यांनी आठवले यांचे स्वागत केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले की, “विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे समाजवादी कार्यकर्त्या म्हणून पुढे आल्या.त्यांनी काही वर्षे रिपाइंचे काम केले आहे.शिवसेनेत ही काम केले. त्याना तेथे चार वेळा आमदार केले.आत्ता त्या शिंदेसेनेत आहेत. विवाह सोहळ्याच्या निमित्त एकत्र आलेले उद्धव ठाकरे व राज ठाकरे कायमस्वरुपी एकत्र येतील असे आपल्याला वाटत नाही.ते एकत्र आले तरी महाराष्ट्रात त्या दोघांची ताकद नगण्य आहे.राज ठाकरे यांच्या एवढ्या मोठ्या सभा होऊन ही त्यांचा एक माणूस निवडून येत नाही.नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा एक ही उमेदवार निवडून आला नाही. लोकसभेला त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्याचा फारसा फायदा झाल्याचे दिसले नाही. दोघे एकत्र आले तरी महायुतीवर परिणाम होणार नाही,” असे रामदास आठवले म्हणाले.
“अनेकदा एकमेकांची जात पात माहित नसताना मुलं मुली एकत्र येतात.एकत्र येऊन संसार थाटावा अशी त्यांची इच्छा असते.कित्येक प्रकरणात धर्म जात बाजूला ठेवून दोघे एकत्र येतात. त्यामुळे प्रत्येक प्रकरणाला लव्ह जिहाद म्हणू नये.हिंदू मुलगी किंवा दलित मुलगी असेल व मुलगा मुस्लिम असेल तर धर्मांतर होऊ नये असे आपले मत आहे.ज्या वेळी कायदा बनेल त्यावेळी त्यात तशी तरतूद असावी,” असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाल्या होत्या नीलम गोऱ्हे?
शिंदे गटाच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनात दिलेल्या मुलाखतीत संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “कुठल्याही कार्यकर्त्याला कमी लेखण्याचं काही कारण नाही. २०१२ वगैरे पर्यंत मी पाहात आले आहे की शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभा, मेळाव्यांना एकनाथ शिंदे यांचेच कार्यकर्ते गर्दी करायचे. दुसरा भाग असा की संपर्क नको असेल नेत्यांना तर तिथे आपण राहण्यात काही अर्थ नाही. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं. नंतर अवनती होत गेली त्यानंतर त्यांनी आम्हाला भेटीच मिळणार नाहीत हे माहीत नव्हतं,” असे मत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे.