
एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! (Photo Credit- X)
मुंबई : एसटीची सेवा वेळेवर धावली तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असा ठाम संदेश देत परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला वक्तशीरपणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. परिवहनमंत्र्यांच्या निर्देशानंतर एसटी वेळेत धावेल, असे आता म्हटले जात आहे.
मंत्रालयातील दालनात आयोजित उत्पन्नवाढ आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. ते म्हणाले, एसटी बस ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. किफायतशीर दर, सुरक्षित प्रवास आणि शासनाच्या विविध सवलतींमुळे प्रवाशांचा ओघ वाढत असताना सेवेत वक्तशीरपणा नसेल तर ही वाढ टिकणार नाही. प्रवाशांना ताटकळत ठेवणे म्हणजे त्यांना पर्याय शोधायला भाग पाडण्यासारखे आहे. दैनंदिन प्रवासात बस उशिरा सुटणे, रस्त्यात बंद पडणे किंवा अचानक फेऱ्या रद्द होणे, या तक्रारींचा पाऊस आगार प्रशासनावर पडत आहे.
दरम्यान, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करून प्रत्येक फेरी नियोजित वेळी सुटेल याची खात्री करावी, असे आदेश परिवहनमंत्र्यांनी यावेळी एसटी प्रशासनाला दिले.
नियोजनबद्ध देखभाल गरजेची
प्रत्येक वेळेवर सुटणारी बस म्हणजे वाढत्या उत्पन्नाकडे जाणारे एक पाऊल, असे सांगत परिवहनमंत्र्यांनी वक्तशीरपणाचा थेट संबंध महसुलाशी जोडला. वारंवार होणाऱ्या उशिरामुळे हक्काचा प्रवासी खाजगी पर्यायांकडे वळतो, ही बाब गंभीर असल्याचे देखील अधोरेखित केले. एसटीचा वाढता दैनंदिन खर्च लक्षात घेता, उत्पन्नवाढीसोबतच काटकसरीचे धोरण काटेकोरपणे राबवण्याची गरज आहे. स्थानिक पातळीवर नियोजनबद्ध देखभाल, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि व्यवस्थापनातील शिस्त यावर भर देण्याचे निर्देश दिले.
वक्तशीरपणा हीच एसटीची नवी ओळख व्हावी
वक्तशीरपणा हीच एसटीची नवी ओळख व्हावी. वेळेवर धावणारी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होणारी एसटी हाच पुढील वाटचालीचा मंत्र आहे.
– प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
हेदेखील वाचा : Mumbai-Pune Express वे वर 32 तासांचा ट्रॅफिक जाम; कोंडी दूर करण्यासाठी पोलिसांची तत्परता