
Damanganga-Vaitarna-Godavari River Link Project
१४ ऑक्टोबर २०२४ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विशेष प्रयत्नातून राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. आमदार माणिकराव कोकाटे यांनी या प्रकल्पासाठी अजित पवारांकडे पाठपुरावा केला होता. दादांच्या पश्चात या प्रकल्पासाठी निधी मिळणार किंवा नाही याकडे सिन्नरकरांचे डोळे लागले होते. मात्र अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याने सिन्नरचा दुष्काळ कायमस्वरूपी मिटण्यास मदत होणार आहे.
या नदीजोड प्रकल्पातून सिन्नर तालुक्यासाठी ५.५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून त्यातून सुमारे २० हजार क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प वास्तवात येण्यासाठी गेल्या ५-६ वर्षापासून आमदार माणिकराव कोकाटे सातत्याने प्रयत्न करत होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंचाळे येथे विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योजनेस मान्यता देण्याचा शब्द सिन्नरकरांना देत तो त्यांनी खरा करुन दाखवला होता. दरम्यान, राज्यशासनाकडून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध झाल्याखेरीज तो पूर्णत्वास जाणे शक्य नव्हते. दादांच्या पश्चात या प्रकल्पाचे काय होणार, या प्रश्नांचे काहूर सिन्नरकरांच्या मनात होते.
या नदीजोड प्रकल्पाद्वारे पश्चिम वाहिनी नद्यांचे ७.१४ टीएमसी पाणी वळविण्यात येणार आहे. हा प्रकल्प पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथून कार्यान्वित होणार आहे. दमणगंगा उपखोऱ्यातील वाल नदीवर निलमाती, वाघ नदीवर मेट, वैतरणा उपखोऱ्यात पिंजाळ नदीवर कोशिम शेत, गारगाई नदीवर उधळे या चार धरणांद्वारे पाणी उचलले जाणार आहे. प्रकल्पातील प्रस्तावित धरणे, वितरण व्यवस्था व रोहित्र, उपकेंद्रातील संरक्षण यासाठी एकूण १२८०.५ हेक्टर क्षेत्र संपादित होणार आहे. या योजनेतून तब्बल १७,९६० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून औद्योगिक व इतर पाण्याचे शुद्धीकरण करून एकुणे सुमारे २० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे शासनाचे प्रस्तावित आहे.
समुद्रात वाहून जाणारे पश्चिम वहिनी गारगाई, दमणगंगा व वैतरणा नद्यांचे पाणी दमणगंगा उपखो-यातील वाल नदीवर निलमाती, वाध नदीवर मेट, वैतरणा उपखो-यात पिंजाळ नदीवर कोशिम शेत, गारगाई नदीवर उधळे ही चार धरणे बांधून अडवले जाईल, यातील २० टक्के पाणी स्थानिक शेतकऱ्यांना देण्याची तरतुद असून उर्वरित पाणी उपसा पध्दतीने वैतरणा धरणात टाकले जाईल, वैतरणा धरणातून कॅनॉल अथवा पाईपलाईनद्वारे पाणी आणून ते कड़वा धरणात टाकले जाईल, कडया धरणातून सिन्नर तालुक्यासाठी आरक्षीत असलेले साधारणतः ५.५ टीएमसी पाणी बोरखिंड येथील प्रस्तावित धरणात कोळवाल नाल्याद्वारे टाकले जाईल.
बोरखिंड धरणातून पाईपलाईनद्वारे सोनांवे येथे देवनदीत हे पाणी सोडले जाईल. देवदीत टाकलेले पाणी उच्च तलांक उजव्या कालव्याद्वारे सीनाबे, सोनारी, डुबेरे, पाटोळे, गोंदे, दापूर, नांदूरशिंगोटे पर्यंत नेण्यात येईल, डाव्या कालव्यामार्फत सोनांबे, खापराळे, मालेगाव, ढग्याडोंगर, सुळेवाडी, पाटपिप्री, गुळवंच मार्ग वडांगळीपर्यंत नेण्यात येईल. तसेच खापराळे शिवारातून वडगाव पिंगळा, चिंचोली, वडझिरे, नायगाव, जायगाव शिवारात पाणी फिरेल.
याव्यतिरिक्त देवनदीवर असलेल्या कुंदेवाडी ते सायाळे व खोपड़ी ते मिरगाव या पूरकालव्याद्वारे, तसेच देवनदीवर असलेल्या सेकंडक्लास कालव्याद्वारे तालुक्याच्या सर्वच भागांत पोहचणार असून याद्वारे तालुक्यातील जवळपास २० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. तसेच सिन्नर तालुक्यातील दोन्ही औद्योगिक वसाहती, मुंबई-दिल्ली कॉरीडॉर प्रकल्पासाठी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे, याचबरोबर औद्योगिक क्षेत्राला दिलेले पाणी रिसायकल करुन सिंबनासाठीसुध्दा उपलब्ध होणार आहे.