
या स्पर्धेच्या माध्यमातून युवकांना “ड्रग्जला नाही, क्रीडेला होकार” असा सामाजिक संदेश देण्यात आला. आजच्या घडीला ड्रग्जचे वाढते प्रमाण हे समाजासमोर गंभीर आव्हान बनले असून अनेक तरुण चुकीच्या मार्गाला अवलंबत आहेत. व्यसनाधीनतेमुळे केवळ व्यक्तीच नव्हे तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत असून समाज व देशाच्या भवितव्यावरही त्याचा परिणाम होत आहे. याच पार्श्वभूमीवर युवकांना व्यसनमुक्त जीवनाची प्रेरणा मिळावी व त्यांच्यात क्रीडा संस्कृती वाढीस लागावी यासाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या अंतिम सामन्यांना ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील, कळवा-मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड तसेच प्रभाग क्रमांक ११४ च्या नगरसेविका राजोल पाटील यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
यावेळी खासदार संजय दिना पाटील यांनी युवकांशी संवाद साधताना ड्रग्जविरोधात कठोर भूमिका घेण्याची गरज अधोरेखित केली. युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. ईशान्य मुंबई परिसरात वाढत्या ड्रग्जच्या समस्येविरोधात खासदार संजय दिना पाटील यांनी यापूर्वीही वेळोवेळी आवाज उठविला आहे. विविध बैठका, पोलीस प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चांमध्ये त्यांनी ड्रग्जविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परिसरात सुरू असलेल्या अवैध ड्रग्ज व्यवहारांवर अंकुश आणण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, युवकांमध्ये जनजागृती करावी तसेच शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात अधिक दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सातत्याने प्रशासनाकडे केली आहे. समाजातील युवक सुरक्षित राहावेत व व्यसनमुक्त वातावरण निर्माण व्हावे यासाठी खासदार पाटील सातत्याने पाठपुरावा करत असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
ईशान्य मुंबईतील युवकांना क्रिकेटसारख्या खेळांमध्ये मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले. अनेक गुणवंत खेळाडूंना आर्थिक अडचणींमुळे पुढे जाता येत नाही, त्यामुळे अशा स्पर्धांमधून त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. क्रीडा क्षेत्रामुळे युवकांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्पर्धेदरम्यान खेळाडूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. अंतिम सामन्यांवेळी प्रेक्षकांनी मैदानावर मोठी गर्दी केली होती. स्थानिक युवक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत ड्रग्जविरोधी जनजागृतीसाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.