
पुण्यात वाढतोय उष्माघाताचा तडाखा; कमला नेहरू रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन
पुणे : राज्यात उन्हाचा पारा चाळीशी पार गेल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
वाढत्या उष्म्यामुळे होणाऱ्या आजारांवर तातडीने उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयात एकूण १० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये ५ खाटा पुरुषांसाठी आणि ५ खाटा महिला रुग्णांसाठी स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गेल्या दीड महिन्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे विविध आजार उद्भवलेल्या जवळपास ८०० रुग्णांनी महापालिकेच्या विविध दवाखान्यात आणि रुग्णालयांमध्ये उपचार घेतले आहेत. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
पुणे महानगरपालिकेतर्फे आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना
नागरिकांनी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी खालील खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. भरपूर पाणी प्या. चहा, कॉफी आणि शीतपेये टाळा. त्याऐवजी लिंबूपाणी, ताक आणि शहाळ्याचे पाणी यांसारख्या नैसर्गिक पेयांचे सेवन करा.
प्रवासात किंवा बाहेर जाताना सुती आणि सैल कपड्यांचा वापर करा. सोबत टोपी, रुमाल आणि गॉगल ठेवा. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळा. आहारात काकडी, टरबूज, कलिंगड अशा पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांचा समावेश करा.
अस्वस्थ वाटत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या…
स्वयंपाकघरातील उष्णतेचा त्रास टाळण्यासाठी स्वयंपाकाची कामे शक्यतो सकाळी ११ पूर्वी पूर्ण करा. जर तुम्हाला चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे किंवा मळमळणे असे त्रास होत असतील, तर विलंब न करता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीर राहील फ्रेश आणि हायड्रेट
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर स्किन केअर किंवा हेअर केअर रुटीनमध्ये ज्याप्रमाणे बदल केला जातो, तसाच बदल आहारात करणे सुद्धा आवश्यक आहे. कारण वाढत्या उन्हाळ्यात शरीराला पाण्याची खूप जास्त आवश्यकता असते. कडक उन्हात कुठेही बाहेर गेल्यानंतर खूप जास्त थकल्यासारखे वाटते तर काहींना अचानक चक्कर सुद्धा येते. त्यामुळे या दिवसांमध्ये आहारात बदल करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात खूप जास्त तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे ऍसिडिटी, अपचन किंवा आरोग्यासंबंधित संमस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते.