राज्य सरकार आहे की, नाराज सरकार; नाराजीनाट्यावरून शरद पवार गटाचा खोचक टोला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असून त्या दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या दावोसदौऱ्यावर शरद पवार गटाने हल्लाबोल केला. ‘दावोसमध्ये होत असलेल्या कंपन्याची नावे पाहता, अधिकतम भारतीय कंपन्या आहेत. मग या कंपन्यासोबत करार करण्यासाठी दावोसला जाण्याची खरंच गरज होती का? असा सवाल शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी विचारला आहे. ‘महाराष्ट्रात राज्य सरकार आहे की, नाराज सरकार आहे? असाही सवाल करत कोल्हे यांनी टीका केली.
आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोका कोला कंपनीच्या सीएसआर निधीतून बसविण्यात आलेल्या डिजिटल बोर्डचे उद्घाटन खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कोल्हे प्रसारमाध्यमांशी बोलले.
‘राज्यात राज्य सरकार आहे की, नाराज सरकार आहे? असा खिल्ली उडवणारा प्रश्न कोल्हे यांनी विचारला आहे. गेली दोन महिने मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्रिपदाचे वाटप या नाराजीनाट्यातच सरकार गुरफटलं आहे, अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. असंवैधानिक पदासाठी हे चढाओढ का करत आहेत? केवळ जिल्ह्यातील निधी वाटपाचे हक्क मिळावे, यासाठी हे सगळं चाललं की विकासासाठी चाललंय? असे अनेक प्रश्न अमोल कोल्हे यांनी उपस्थित केले आहेत.
‘विमानतळाप्रमाणे हातातोंडाशी आलेला पुणे-नाशिक रेल्वेला घास हरवायचा आहे? की तीस देशांच्या संशोधनासाठी जुन्नरमध्ये होणाऱ्या जीएमआरटी प्रकल्पाचं ओझं वाहायचं आहे? असा प्रश्न कोल्हे यांनी उपस्थित केलाय. जीएमआरटी हवं असेल तर पुणे-नाशिक रेल्वे रद्द होणार नाही, असा तोडगा सरकारने काढावा, अशी मागणी कोल्हे यांनी केली.
दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने इतिहास घडवला आहे. महाराष्ट्राने आजच्या दुसर्या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल.
आजच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून, पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट या क्षेत्रात ते 3,05,000 कोटी इतकी गुंतवणूक करणार आहेत. या एका करारातून 3 लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज आहे. रिलायन्स समूहासोबत 3 लाख 5 हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला असून यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्याने सुमारे 3 लाख रोजगार निर्मिती यातून होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात नवभारताच्या निर्मितीत योगदान देणारा हा करार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य बनवावे, हे स्वप्न आहे. त्यादृष्टीने आम्ही ही गुंतवणूक करणार आहोत, असे रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी यावेळी सांगितले.