'सोलापूर जिल्हा परिषदेच्या अनुकंपा भरतीचे काम राज्यात आदर्श'; ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरेंचे गौरोद्गार
सोलापूर : जिल्हा परिषदेत अनुकंपाधारकांनी गुरुवारी आनंदोत्सव साजरा केला. पालकमंत्री साहेब आम्हाला नोकरी मिळाली, आम्ही सुखावलो, अशा शब्दांत अनुकंपाधारकांनी आनंद व्यक्त केला. सोलापूर जिल्हा परिषदेच्या अनुकंपा भरतीचे काम राज्यात आदर्श असे असल्याचे गौरोद्गार राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काढले.
सोलापूर जिल्हा परिषदेने 44 कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे पत्र पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. हा विस्मरणीय सोहळा पाहून अनुकंपाधारकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. सीईओ कुलदीप जंगम यांनी प्रलंबित अनुकंपा भरती करण्याचा धडका लावल्याने अनुकंपाधारक सुखावला आहे. गुरुवारी जिल्हा परिषद मुख्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात अनुकंपा नोकर भरतीचे पत्र वितरण करण्यात आले.
आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी ज्ञानदेव घुले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, शिक्षणाधिकारी कादर शेख, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले प्रमुख उपस्थित होते.
यावेळी राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, ‘राज्यात १०० दिवस कार्यक्रमअंतर्गत अनुकंपा पदभरती पारदर्शकपण राबवण्यात आली. सोलापूर जिल्हा परिषदेने यात आघाडी घेत सर्व अनुकंपाअंतर्गत १०० टक्के जागा भरून उत्कृष्ठ काम केले आहे. जिल्हा परिषदेच्या सीईओ हे जर प्रशासक असतील तर किती चांगले प्रकारे काम करू शकतात, याचे हे आदर्श उदाहरण आहे. समुपदेशन करून पदस्थापना देण्यात आली, ही बाब कौतुकास्पद आहे’.
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबवा
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबवा. सोलापूर जिल्हा हा राज्यात या अभियानात आघाडीवर असायला हवा. जिल्ह्यात परिस्थिती असल्यामुळे या अभियानाची गती मंदावली असली तरी पुरं ओसरल्यानंतर या अभियानास गती द्या, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
जिल्हा परिषदेचे कौतुक; नियुक्त कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू
अनुकंपा भरती प्रक्रियेत जिल्हा परिषद सोलापूरचे पारदर्शक पाऊल टाकत 44 पदांची यशस्वी समुपदेशनाद्वारे भरती केल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी राबवलेल्या नाविन्यपूर्ण पॅटर्नचे राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी कौतुक केले असतानाच आज नियुक्ती पत्र मिळताच कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले..!
अनुकंपा तत्वावर भरती ही एक संवेदनशील प्रक्रिया
सीईओ कुलदीप जंगम म्हणाले, अनुकंपा तत्वावर भरती ही एक संवेदनशील प्रक्रिया असून, तिच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि न्यायाचा तत्वधाराच असणे आवश्यक असते. याच अनुषंगाने जिल्हा परिषदेने संपूर्ण प्रक्रिया वर्तमानपत्र जाहिरात, अर्ज छाननी, सूची प्रसिद्धी आणि प्रत्यक्ष समुपदेशन अशा टप्प्यांमधून पार पाडली. यामध्ये कोणतीही अस्पष्टता न ठेवता, अर्जदारांना संधी आणि माहिती दोन्ही समप्रमाणात उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोहिम पातळीवर काम करून ही प्रक्रिया पार पाडल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आपल्या प्रास्तविक भाषणात सांगितले.