राजन विचारे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी (फोटो सौजन्य-X)
ठाणे : ठाणे शहरात जड अवजड वाहने सकाळी ७ ते १० या वेळेत सोडू नका असे आदेश वाहतूक प्रशासनाला वारंवार देऊन सुद्धा वाहतूक शाखेकडून निव्वळ धूळफेक केली जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहराच्या घोडबंदर भागात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामध्ये सर्विस रोडचे सुद्धा विलीनीकरणाचे काम सुरू आहे. घोडबंदर रोड सर्विस रोड विलीनीकरण काम तत्काळ थांबवा, नाहीतर ठाणेकरांच्या उद्रेकाला सामोरे जा अशी मागणी शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
राजन विचारे यांनी आज (17 सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे घोडबंदरच्या वाहतूक कोंडी व सेवा रस्ता विलीनीकरण याकडे लक्ष केंद्रित केले आहे. या पत्रामध्ये ठाणे शहराचे घोडबंदर पट्ट्यात झपाट्याने होत असलेले शहरीकरणामुळे या परिसरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. येथे राहणारे नागरिक नोकरी निमित्त आपली खाजगी वाहने घेऊन घरा बाहेर पडत असतात.अवजड वाहने सकाळी ७ ते १० या वेळेत बंद राहण्याचे आदेश असताना वाहतूक शाखेच्या हलगर्जीपणामुळे अवजड वाहने सोडली जात आहेत. मात्र सततच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे काही मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. त्यामुळे या वाहतूक कोंडीला नागरिक त्रस्त झाले असून दररोज घोडबंदर पट्ट्यातील नागरिक तसेच खाजगी संस्था रस्त्यावर उतरत आहेत.
खड्यामुळे होणारे अपघात व वाहतूक कोंडी संदर्भात नागरीक आंदोलन छेडत असून याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. ठाणे महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी हायवे पूर्व दुती महामार्गावरील दोन्ही बाजूस सेवा रस्ता सर्विस रोड विकसित केले होते. ही कामे टप्प्याटप्प्याने सुरू होती त्यामध्ये चार ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द असल्याने त्या ठिकाणी सर्विस रोड महापालिकेला करता आला नाही.
सर्विस रोड रस्ता हायवे प्रवृत्ती महामार्गास विलीनीकरणाचा घाट ठाण्यातील काही मंडळी करत आहेत. जर हा सर्विस रोड हायवे पुर्वदुती महामार्गावर विलीनीकरण झाल्यास या रस्त्याच्या दोन्ही बाजूस ८ लाखाच्या वर लोकसंख्या असणाऱ्या वस्तीत सोसायटी, शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल, चर्च, मंदिरे, बाजारपेठ, यांना धोका निर्माण झाला आहे.पर्यायी रस्ता नसल्याने भविष्यात हायवे जाम झाल्यास किवा आपत्कालीन स्थितीत फायर ब्रिगेड व ॲम्बुलन्स कशी जाणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
सद्यस्थिती या सेवा रस्ता विलीन करण्याचे काम एमएमआरडीएने हाती घेतले आहे. या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी नरेश मनेरा यांनी हि बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त यांना दि.२२/०१ /२०२५ व दि.१३/०३/२०२५ रोजी बैठक घेऊन नागरिकांना विश्वासात न घेता काम कसे सुरु झाले याचा जाब विचारण्यासाठी गेलो असताना एम एम आर डी ए व स्थानिक नागरिक यांच्या सोबत बैठकीचे आयोजन करून देण्याचे आश्वासन केले होते परंतु हे आश्वासन खोटे ठरले अद्याप बैठक घेण्यात आली नाही.