
मिलिंदनगरच्या २८ घरांवर जेसीबी, सहा तास चालली कारवाई
नाशिक : नंदीनी नदीवर बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलाच्या रस्त्याला आडकाठी ठरणाऱ्या तिडके कॉलनीतील मिलींदनगर येथील २८ घरांवर अखेर मनपाच्या अतिक्रमण विभागाने जेसीबी चालविला. पुलाला लागून शंभर मीटरचा रस्ता नव्याने करण्यात येणार असल्याने दोन्ही बाजुच्या घरांचा अडथळा दूर करण्यात आला. मोठी कारवाई असल्याने सुमारे तीनशे पोलीस, मनपाचे शंभराहून अधिक कर्मचाऱ्यांनी तब्बल सहा तासात रस्ता मोकळा केला.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात होणारी गर्दी लक्षात घेता मिलींदनगरला नंदीनी नदीवर सध्या असलेल्या पुलावर दररोज वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांब रांगा लागत असल्याने जुन्या पुलालाच काही अंतर सोडून नवीन पुलाचे काम करण्यात येणार आहे. या पुलामुळे त्र्यंबकरोड ते मुंबई रस्ता जोडला जाणार असल्याने नंदीनी नदीच्या एका बाजुला वसलेल्या मिलींद नगरमधील घरांचा अडथळा निर्माण झाला होता. अनेक वर्षांपासून येथे वस्ती असल्याने त्यांना हटविण्याची मोठी जोखीम होती. त्यासाठी बांधकाम खाते व नगररचना विभागाने सर्व्हे करून डिमार्केशन केले होते तसेच घरमालकांना दिड ते दोन महिन्यांपुर्वी नोटीसाही देण्यात आल्या होत्या, त्यातील बहुतांशी नागरिकांनी काही दिवसांपुर्वीच स्वतःहूनच घरातील सामान अन्यत्र हलवून दरवाजे, खिडक्या काढून नेल्या होत्या तर काही दुमजली, तिमजली घरांच्या इमारती उभ्या होत्या. अखेर शुक्रवारी (दि.१३) सकाळी मनपा आयुक्त मनिषा खत्री यांच्या आदेशान्वये अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त संगीता नांदुरकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई सुरू करण्यात आली.
या कारवाईसाठी मनपाचे पाच जेसीबी, पोकलैन, गैस कटर, हातोडा, फावड्यांसह शेकडो मनपा कर्मचारी सकाळी नऊ वाजता मिलींदनगरला दाखल झाले व अवघ्या काही वेळेतच कारवाईला सुरूवात करण्यात आली. या कारवाई मोहीमेस स्थानिकांकडून विरोध होण्याची शक्यता गृहीत धरून पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह दिडशे पोलीस अधिकारी व तीनशे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मिलींदनगरच्या प्रत्येक गल्लीत पोलीस तैनात करण्याबरोबरच तिडके कॉलनीतील दोन्ही रस्त्यावरही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच अत्यावश्यक बाब म्हणून रुग्णवाहिका, अतिरीक्त डम्पर व कर्मचारीही या कारवाईच्या दरम्यान राखीव ठेवण्यात आले होते.
त्र्यंबकरोड व मुंबईकडे जाणारे रस्ते जोडणाऱ्या नंदीनी नदीवर ४५० मीटरचा नवीन पुल उभारण्यात येणार असून, त्यासाठी नयनतारा समोरील बाजुला असलेल्या ४० झाडे काही दिवसांपुर्वीच हलविण्यात आले. पुलाला जोडून दोन्ही बाजूंनी शंभर मिटरचा रस्ता करण्यात येणार आहे. त्यामुळे गोविंदनगरकडून नाशिक शहराकडे जाणाऱ्या वाहनचालकांची मोठी सोय होणार आहे.
मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, विभागीय अधिकारी चंदन घुगे, राजाराम जाधव, प्रज्ञा त्रिभूवन, मदन हरिश्चंद्र, नानासाहेब साळवे, सुमन गवळी, उपभियंता निलेश साळी, प्रदीप भामरे, विनायक जाधव, प्रवीण बागुल, अमित पवार, उमेश खैरे, निखिल तेजाळे, तानाजी निगळ, बापू लांडगे, सुनील कदम, जावेद शेख, श्रीराम शिंदे, सुमित दिवे, भगवान सूर्यवंशी, जीवन ठाकरे, आदींनी यात भाग घेतला.
चर्नी रोड -गिरगाव पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन