सरकारची चिंता वाढली! मराठा वादळ मुंबईत धडकणार; पश्चिम महाराष्ट्रातील मराठा आंदोलक सज्ज
सातारा : मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईतील आजार मैदानावर पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या पूर्वसंध्येला पश्चिम महाराष्ट्रातून हजारो मराठा आंदोलन कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार असून, आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय येथून हटणार नाही, अशी भूमिका साताऱ्यात मराठा समन्वयकांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली आहे.
सकल मराठा समाजाच्या समन्वयक नेत्यांनी सातारा येथील पत्रकार संघाच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विवेकानंद बाबर, माऊली सावंत, किरण भोसले, सोहम शिर्के, विक्रम शितोळे, महेश जाधव, प्रकाश भोसले, राजेंद्र निकम, रवींद्र शेळके इत्यादी उपस्थित होते.
विवेकानंद जाधव म्हणाले, २८ ऑगस्ट रोजी लाखो मराठा बांधव नवी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांच्या मुक्कामाच्या सोयी सुविधांची काटेकोर व्यवस्था केली जाणार आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या विशाल मोर्चा व उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात तालुका निहाय बैठकांचे नियोजन पूर्ण होऊन कार्यकर्ते आता मुंबईच्या दिशेने निघण्यासाठी सज्ज झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते पुणे जिल्ह्यातील चाकण येथील शिवाजी चौकामध्ये जमणार आहेत. तिथून हे आंदोलन किल्ले शिवनेरी येथील मुक्कामानंतर जुन्नर, चाकण, तळेगाव, खोपोली, पनवेल मार्गे २८ ऑगस्ट रोजी मुंबईत दाखल होणार आहे.
सातारा जिल्ह्यात ५४ लाख नोंदी आढळल्या
मराठा समाज हा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे. हे प्रमाण सुमारे ३२ टक्के इतके आहे. सातारा जिल्ह्यासह वेगवेगळ्या जिल्ह्यात सुमारे ५४ लाख नोंदी आढळून आल्या असून, मराठा हाच कुणबी समाज आहे. तसा शासकीय अध्यादेश राज्य शासनाने काढावा, अशी मागणी पहिल्यापासून करण्यात येत आहे. यंदा आझाद मैदानावर मराठा आरक्षणाचा जीआर घेऊनच आम्ही उठणार आहोत. यावेळी राज्य शासनाला कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असे समन्वयकांनी स्पष्ट केले.
विरोधी भूमिका घेतल्यास करेक्ट कार्यक्रम
सातारा जिल्ह्यातून माण खटावचा गणपती घेऊनच आम्ही आझाद मैदानावर बसून तेथे रोज बाप्पांची आरती करणार आहे. ज्या दिवशी मराठा आरक्षणाचा जीआर निघेल त्या दिवशी बाप्पाांचे अरबी समुद्रात विधिवत विसर्जन करणार आहोत. सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. ते आमच्या या मागणीबद्दल सकारात्मक आहेत, असा विश्वास समन्वयकांनी व्यक्त केला. जे विरोधी भूमिका घेतील त्यांचा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.