
बोर घाटातील कोंडीमुळे महाराष्ट्राला दररोज 1कोटींचा फटका; 'Missing Link' प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर
महाराष्ट्र दिनी मिसिंग लिंक मार्ग सुरू होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’लवकरच नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. या मिसिंग लिंकचे 1 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.
मुंबई आणि पुणे ही महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरे आहेत. मिसिंग लिंक सुरू होण्याआधी मुंबई पुणे शहरामधील वाहतूक द्रुतगती महामार्गवरून सुरू आहे. या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या बोर घाटातील वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र या घाटातील वाहतूक कोंडी केवळ प्रवाशांना नव्हे तर राज्याच्या अर्थव्यवस्थेला देखील मोठी हानी करत असल्याचे समोर आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, बोर घाटात होत असलेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे तब्बल 1 कोटींचे इंधन वाया जात असल्याचे समोर येत आहे. ही आकडेवारी वर्षाची किंवा एखाद्या महिन्याची नसून, एका दिवसाची आहे. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला नुकसान सहन करावे लागत आहे.
वाहतूक नव्हे तर आर्थिक ‘कोंडी’
गेले अनेक वर्षे महाराष्ट्रात बोर घाटातील वाहतूक कोंडीमुळे अर्थव्यवस्थेला हे नुकसान होत आहे. इंधन वाया जात आहेच, त्यापाठोपाठ हजारो प्रवाशांचा वेळ वाया जात आहे. यामुळे मालवाहतुकीला उशीर होत आहे. अपघात आणि लॉजिस्टीक कंपन्यांना भरावा लागणारा दंड यात समविष्ट आहे. या ठिकाणी होणारी कोंडी केवळ वाहूतकीची नसून राज्याचे आर्थिक नुकसान करणारी देखील ठरत आहे.
मुंबई-पुणे प्रवास आता सुपरफास्ट!
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नल-फ्री होणार आहे. सुमारे १०.५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे १८२ मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. सुमारे २३.७५ मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. ७० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. लोणावळा तलावाच्या १८२ मीटर खालून हा रस्ता जाणार आहे.