
राज्यातील अनेक जिल्ह्यांवर अवकाळी संकट; सलग दोन दिवस पावसामुळे गहू, ज्वारी पिकाला फटका
मुंबई : सलग दोन दिवस पाऊस झाल्यामुळे राज्यातील गहू, ज्वारी, द्राक्ष पिकाला फटका बसला असून, वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात तापमानाचा पारा घसरल्याने तसेच कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. हीच परिस्थिती शनिवारीही कायम राहणार असून, राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये अवकाळी संकट घोंघावत आहे.
सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. मनमाड परिसरात दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होत असल्याने काढणीला आलेल्या गव्हाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी पहाटेपासून गहू काढणीच्या कामाला लागले असून, पावसाचे संकट उभे राहिले आहे.
बीड जिल्ह्यात शेती पिकांसह फळबागांचे नुकसान
बीड जिल्ह्यातील वडवणी आणि केज या दोन तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाऱ्यासह गारांचा दमदार पाऊस झाला. यामध्ये दोन्ही तालुक्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
गारपिटीचा ज्वारी पिकाला तडाखा
धाराशिव तालुक्यामध्ये काल झालेल्या अवकाळी आणि गारपिटीमुळे ज्वारी पीकाचे नुकसान झाले आहे. पावसाने मातीमोल झालेली ज्वारी आता शेतकऱ्यांना विक्री करता येणार नाही. त्यामुळे काढणीचा खर्च सुद्धा निघणे कठीण झाले आहे. धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळा गावामध्ये ज्वारीचे पीक पुर्णपणे मातीमोल झाल आहे.
नांदेड जिल्ह्याला पावसाने झोडपले
गेले काही दिवस नांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. गुरुवारी सायंकाळी अनेक ठिकाणी आवकाळी पाऊस आणि गरपीट झाली. या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्याला बसला. अर्धापूर तालुक्यातील रोडगी, सोनाळा, चाभरा, खैरगाव, निमगाव या शिवारात गारांचा पाऊस झाला.
परभणीत गारपीटांचा आंब्याला फटका
परभणी जिल्ह्यात गुरुवारी रात्री विजांच्या कडकडासह वादळी वारा सुटला होता यात वाऱ्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले पाहायला मिळत नुकसान आहेत. तर आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहायला मिळत आहे. अक्षरशः आंबा पूर्णपणे खाली पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आंब्याचे नुकसान झाले आहेत.
हेदेखील वाचा : अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान; पुणे-कोल्हापूर मार्गालाही तडाखा