पुणे : एकीकडे पेट्रोल व डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुचाकी, चारचाकी ई-वाहनांसाठी खरेदीमध्ये मोठी सवलत मिळत असून, इलेक्ट्रिक चार्जिंगद्वारे स्वस्त इंधन देखील उपलब्ध होत आहे. त्यामुळे ई-वाहनांचा वापर ही काळाची गरज झाली आहे, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सोमवारी (दि. ४) सांगितले.
महावितरणकडून राज्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ५० नवीन ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येत आहेत. त्यापैकी पूर्णत्वास गेलेल्या बाणेर येथील पहिल्या ई-व्ही चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन डॉ. राऊत यांच्या हस्ते आज झाले. यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे, कार्यकारी संचालक (प्र.) किशोर परदेशी, पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे, कार्यकारी संचालक संजय मारूडकर (महानिर्मिती), मुख्य अभियंता सचिन तालेवार यांच्यासह अनेकांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. नितीन राऊत म्हणाले की, राज्य शासनाने ई-वाहन धोरणामध्ये ई-वाहनांच्या खरेदीमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी मोठे अनुदान जाहीर केले आहे. त्याप्रमाणे दुचाकी ते चार चाकी प्रवासी व मालवाहतूक ई-वाहनांच्या खरेदीमध्ये १० हजार ते २० लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. यासोबतच सर्व इलेक्ट्रिक वाहनांना रस्ते करांमधून माफी देण्यात आली आहे.
सध्या पेट्रोल व डिझेलचे दर १०० रुपयांपेक्षा अधिक झालेले आहेत. त्यामुळे पेट्रोल व डिझेलवरील वाहनांच्या इंधनासाठी प्रति किलोमीटर ७ ते ८ रुपयांचा खर्च येतो. मात्र, इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांसाठी प्रति किलोमीटर १ रुपया ७० पैसे तर दुचाकी ई-वाहनांसाठी प्रति किलोमीटर केवळ ८५ पैसे खर्च येईल. सोबतच केवळ बॅटरी बदलण्याखेरीज इतर देखभाल व दुरुस्तीचा नियमित खर्च नसल्याने सद्यस्थितीत ई-वाहनांचा वापर ही काळाची गरज झालेली आहे.