
विनायक राऊत आणि गितेश यांच्या अडचणींत वाढ; कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने ठाण्यातील कापूरबावडी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तेव्हा सून गिरीजा राऊत यांनी लग्नापूर्वी खोटी माहिती देणे, नपुंसकत्व लपवण्याचा प्रयत्न, शिवाय शारीरिक, आर्थिक व मानसिक छळाचा आरोपही केला. यानंतर आता विनायक राऊत यांच्यासह त्यांचा मुलगा गितेश यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण ठाणे न्यायालयाने दोघा पिता-पुत्राचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
23 रोजी होणाऱ्या सुनावणीपूर्वी दोघांवर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. विनायक राऊत यांच्या स्नुषा गिरीजा यांनी तक्रारीत म्हटले की, लग्नापूर्वी स्वतःचा बंगला असल्याचे खोटे सांगून फसवणूक करणे, नपुंसकत्व लपवण्यासाठी भोंदूबाबांच्या माध्यमातून अघोरी जादूटोणा करणे आणि शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ करून मला त्रास दिला.
याप्रकरणी गिरीजा यांनी विनायक राऊत, त्यांची पत्नी, मुलगा गितेश आणि ३ भोंदू बाबांवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी विनायक राऊत व गितेश यांच्यासह ६ जणांवर गुन्हे दाखल केले. तसेच भोंदूबाबा फिरोज शेख (कोलगाव, सावंतवाडी) याला १२ रोजी रात्री अटक केली होती.
काय आहे नेमकं प्रकरण?
विनायक राऊत यांचे नगरसेवक पुत्र गितेश यांच्याशी ३ डिसेंबर २०१७ रोजी गिरीजा यांचा विवाह झाला होता. लग्नापूर्वी गितेशने वाकोला येथे स्वतःचा बंगला व रुनवाल सिंफनीमध्ये आलिशान फ्लॅट असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात वरात वाकोला झोपडपट्टीतील घरी गेल्यावर फसवणूक झाल्याचे गिरीजा यांच्या लक्षात आले.
शारीरिक संबंधासही नकार
याबाबत विचारले असता गितेश यांनी उर्मटपणे वागून धमकावले होते. लग्नानंतर पती गितेश हा शारीरिक संबंध ठेवत नव्हता. उटी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्वित्झर्लंडला फिरायला गेल्यावरही त्याने जवळीक साधण्यास नकार दिला. याबद्दल विचारल्यावर मारहाण केल्याचे गिरीजा यांनी म्हटले आहे.
आणखी काय म्हटलंय तक्रारीत?
गिरीजा राऊत यांनी तक्रारीत अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. विनायक राऊत कुटुंबाकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. इतकेच नव्हे तर घरात बळजबरीने गोमूत्र प्यायला दिले गेले. माझी सासू, माझा नवरा घरी असताना व तो घरी नसल्यास पूर्णतः वेगळी वागायची. प्रत्येक गोष्टीत मला टोमणे मारुन, माझ्या घरच्यांबद्दल घालून-पाडून बोलून मला मानसिक त्रास यायची. आमच्या नात्यात दुरावा येण्यासाठी व आमच्यात क्लेश होण्यासाठी तिचा मोठा सहभाग आहे.