
दिल्ली, यूपी, मध्य प्रदेशातही पुढील ७ दिवस तापमान वाढणार
वर्धा : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात विदर्भात सूर्य आग ओकत असून, उष्णतेच्या तीव्र लाटेने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी वर्ध्यात पारा ४७.१ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने नागरिक अक्षरशः होरपळून निघाले. यावर्षी उन्हाळ्यात तीनदा वर्धा जिल्ह्याचे तापमान ४६.५ अंशावर गेले होते. बुधवारी सर्व विक्रम मोडीत काढत तापमानाने उच्चाक गाठला. तर नागपूर येथे ४६.६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली.
पुढील ७ दिवसांत तापमानात वाढ होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भारतीय हवामान विभागाचे तज्ज्ञ नरेश कुमार यांनी इशारा दिला की, संपूर्ण उत्तर-पश्चिम भारत, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात उष्णतेची लाट येईल. ही परिस्थिती पुढील ७ दिवस अशीच राहण्याची शक्यता आहे. पश्चिम हिमालयीन क्षेत्रापासून सुरू होऊन जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही उष्णतेची लाट पसरली आहे. सामान्यतः डोंगराळ भागांत उष्णता कमी असते. मात्र, यावेळी तिथेही तापमान असामान्यपणे वाढले आहे. सध्या उत्तर-पश्चिम वारे राजस्थानच्या थार वाळवंटातून उष्ण आणि कोरडी हवा घेऊन येत आहेत.
पुण्याच्या तापमानात मोठी वाढ; तापमानाचा पारा 38 अंशांवर, ढगांची चाहूल तरीही उकडा कायम
वर्ध्यात फारसे औद्योगिकीकरण झालेले नाही. मात्र, सिमेंटीकरणाच्या अतिरेकामुळे उष्णतेच्या झळा शहरांसह ग्रामीण भागातही अधिक तीव्रतेने जाणवत असल्याचे निरीक्षण सध्या नोंदविले जात आहे.
अनेक राज्यांना रेड अलर्ट
हवामान खात्याने दक्षिण उत्तर प्रदेश, उत्तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील विदर्भासाठी पुढील तीन दिवसांचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या भागांमध्ये तापमान ४७ अंश सेल्सिअसच्याही पुढे जाऊ शकते.
अकोल्यातही वाढले होते तापमान
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अकोल्याचे तापमान 47 अंशाच्यावर गेले होते. पण, अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने मे महिन्यात हा पारा ४० ते ४२ अंशाच्या आसपास राहत होते. आता त्यात पुन्हा वाढ होताना दिसत आहे. सोमवारी अकोल्याच्या तापमानाची ४५.०१ सेल्सिअस इतकी नोंद झाली. ही वाढ राज्यात सर्वाधिक म्हणून नोंद करण्यात आली आहे. कायम राखत मंगळवारी तापमान ४५.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले असून, ते राज्यात सर्वाधिक आहे. जिल्ह्यात दिवसभर जिल्हावासियांना उन्हाच्या झळांचा सामना करावा लागला.