(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी मालिका विश्वात मानधन थकबाकीचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आले आहे. काही वर्षांपूर्वी शशांक केतकर यांनी मंदार देवस्थळी यांच्यावर मानधन थकवल्याचा आरोप केला होता. मात्र मला वेळ द्या, असं म्हणत मंदार देवस्थळी यांनी कलाकाराचे पैसे मिळतील, अशी आशा दाखवली होती. पण आता पुन्हा एकदा हा चर्चेचा विषय ठरला आहे. अभिनेते विजय पटवर्धन यांनी या संदर्भात पोस्ट शेअर केल्यानंतर इतर कलाकारांनी देखील पोस्ट शेअर करत मानधन न मिळाले असल्याचे सांगितले.
तसेच, आता पुन्हा एकदा ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेत दिग्दर्शक म्हणून काम पाहिलेले अमित छल्लारे यांनी मानधन थकबाकी संदर्भात शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांनी पोस्ट शेअर करून मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर मानधन थकवल्याचा आरोप केला आहे. आता त्यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल आहे.
अमित छल्लारे यांनी शेअर केली पोस्ट
अमित छल्लारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून लिहिले की, ‘माझ्या कामाचे पैसे अजूनही मिळाले नाहीये.’ नमस्कार. मी अमित छल्लारे. मार्च २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत मी मंदार देवस्थळी सर यांच्या टीम वर्क अल्ट्रा क्रिएशन निर्मित हे मन बावरे या मालिकेसाठी दिग्दर्शक म्हणून काम केले. या एक वर्षात, वेळ काळ न बघता, प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि जीव तोडून काम केले. पेमेंट वेळेत न मिळाल्यामुळे मला सिरिअल सोडावी लागली. पण अजूनही माझे ६,७०,१५१/- (सहा लाख सत्तर हजार, एकशे एकावन्न) रुपयांचे पेमेंट अडकले आहे.’
तसेच ते पुढे म्हणाले, ‘या पाच वर्षांत मी संयम ठेवला, अनेकदा संधी दिली, प्रत्येक वेळी समजून घेतलं, नेहमीच सपोर्ट केला, पण मला फक्तं तारखा आणि आश्वासनं मिळत गेली. मंदार देवस्थळी सर हे खूप सिनिअर आहेत. त्यांच्याबद्दल नेहमीच आदर आहे आणि राहील. म्हणूनच इतके दिवस गप्पं होतो पण आता त्याच गोष्टींचा विचार करून मला खूप मानसिक त्रास होतोय आणि याआधीही झालाय. आता काय करायचं तुम्हीच सांगा सर.’
धनुषला डेट करण्याच्या अफवांवर मृणाल ठाकूरने सोडले मौन; सांगितले दोघांमधील नातं काय?
शेवटी लिहिले, ‘आज हे सगळं इथे शेअर करतोय, कारण इतके दिवस मी तुमच्या अडचणी समजून घेतल्या पण आता माझ्याही काही अडचणी आहेत, त्या तुम्ही समजून घ्याव्या. एकदा माझ्या बाजूनेही विचार व्हावा. मला कुणालाही दोष द्यायचा नाहीये. पण इतकी वर्ष वाट पाहूनही न्याय न मिळणं माझ्यासाठी खुप त्रासदायक आहे. आणि ह्या सगळ्यांत माझं काय चुकलं?’ असे लिहून अमित यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.