(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
नवे वर्ष सुरु होण्यासाठी आता काहीच दिवस बाकी राहिले आहेत. परंतु आता सर्वत्र लग्नाचे सोहळे सुरु आहेत. लग्नातील मज्जा घरांची होणारी धावपळ हे सगळं या सीजनमध्ये पाहायला मिळत आहे. आता याचदरम्यान लग्नाची नवी परिभाषा सांगणारा ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ हं चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना नवा अनुभव, नवी कथा आणि धमाल मनोरंजन पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खुश करून टाकणार आहे, या चित्रपटामध्ये तगडे मराठी स्टारकास्ट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
शुभम फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहून या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता आता प्रचंड वाढली आहे. खरंतर टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यापासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण झाली आहे. ‘लग्न’संस्थेबाबतचे आधुनिक काळाचे विचार अतिशय हलक्याफुलक्या आणि मजेशीर पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आल्याचे टिझरमध्ये दिसून येत आहे. आता ट्रेलर पाहून या चित्रपटाच्या दुसऱ्याही अनेक बाबी समोर आल्या आहेत.
या सगळ्या गोष्टी असतानाच ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’च्या निमित्ताने सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान ही जोडीही पहिल्यांदाच पडद्यावर झळकणार आहे. याव्यतिरिक्त यात प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, शर्मिष्ठा राऊत यांच्याही भूमिका आहेत. त्यामुळे एकंदरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करणार असल्याचे दिसते आहे. आनंद दिलीप गोखले लिखित आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाचे शेखर विठ्ठल मते निर्माते आहेत.
ट्रेलरमध्ये अथश्री आणि गायत्री ही दोन परस्पर विरोधी व्यक्तिमत्वं त्यांच्या लग्नासाठी एकमेकांना पहिल्यांदा भेटताना दिसत असून या दरम्यान काही गंमतीशीर घटना घडताना दिसत आहेत. दोघांचे विचार एकमेकांसोबत शेअर करत असतानाच त्यांच्या आयुष्यातील काही रहस्येही समोर येतात. त्यामुळे यात धमाल तर आहेच तसेच काही ट्विस्टही अनुभवायला या चित्रपटामध्ये मिळणार आहेत. या सगळ्यातून अथश्री आणि गायत्री यांचे लग्न होणार का? हे पाहाण्यासाठी प्रेक्षकांना २० डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण हा चित्रपट येत्या २० डिसेंबरला सिनेमागृहात दाखल होणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले या चित्रपटाबाबत म्हणाले की, “आजच्या काळात लग्न करताना एकमेकांत बघितल्या जाणाऱ्या गोष्टींवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे. लग्न करताना आता तरुणांची विचारसरणी बदलली आहे, त्यांचा लग्नाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन खूप वेगळा झाला आहे. हा सिनेमा तरुणांना विशेष जवळचा वाटेल. असे असले तरी संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा हा चित्रपट आहे. यात मजा, धमाल तर आहेच प्रसंगी प्रेक्षकांना हळवाही बनवेल. कथानकात सुबोध आणि तेजश्रीच्या जबरदस्त अभिनयाने अधिकच रंगत आणली आहे.” असे त्यांनी सांगितले.