
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
The Great Indian Kapil Sharma Show: नेटफ्लिक्सवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो‘ सध्या प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. कपिल शर्मा आणि त्याची टीम प्रत्येक भागात सेलिब्रिटी पाहुण्यांसोबत हास्यविनोदाचा तडका लावताना दिसते. मात्र, या शोबाबत प्रेक्षकांच्या मनात नेहमीच एक प्रश्न असतो—या शोतील विनोद आधीपासून स्क्रिप्टेड असतात की कलाकार ऐनवेळी ते तयार करतात? आता या प्रश्नाचं उत्तर शोमधील लोकप्रिय कलाकार किकू शारदा याने दिलं आहे.
प्रखर गुप्ता यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना किकू शारदाने शोच्या पडद्यामागील अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्याने सांगितलं की, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ पूर्णपणे स्क्रिप्टेड नाही. कार्यक्रमाचा सुमारे ७० टक्के भाग आधीच लिहिलेला आणि नियोजित असतो, तर उर्वरित ३० टक्के भाग कलाकारांच्या उत्स्फूर्त संवादांवर आणि ऐनवेळी सुचलेल्या विनोदांवर अवलंबून असतो.
किकूच्या मते, चित्रीकरणादरम्यान अनेकदा संभाषण अनपेक्षित वळण घेतं. अशा वेळी कलाकार आपल्या विनोदी टायमिंग आणि हजरजबाबीपणाचा वापर करून नवीन संवाद आणि पंच तयार करतात. त्यामुळे शो अधिक नैसर्गिक आणि मनोरंजक वाटतो.
याशिवाय, शोमध्ये येणाऱ्या सेलिब्रिटी पाहुण्यांना कलाकार कोणत्या वेशात येणार आहेत किंवा कोणते विनोद करणार आहेत, याची कोणतीही पूर्वकल्पना दिली जात नाही. पाहुण्यांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या नैसर्गिक प्रतिक्रिया टिपण्यासाठी निर्माते हा फॉर्म्युला वापरतात. त्यामुळे त्यांच्या हसण्यामागे कोणताही बनाव नसून त्या प्रतिक्रिया पूर्णपणे अस्सल असतात.
पॉडकास्टमध्ये किकूने सलमान खानचा किस्साही सांगितला. त्याच्या मते, सलमानला हसवणं हे टीमसाठी मोठं आव्हान असतं. अनेकदा टीमला अत्यंत मजेशीर वाटणाऱ्या विनोदांवर सलमान कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. मात्र, एखादा कलाकार सहजपणे काहीतरी अनपेक्षित बोलला तर सलमान मनापासून हसतो.
किकूने कपिल शर्माच्या विनोदी टायमिंगचंही भरभरून कौतुक केलं. त्याने सांगितलं की, एखादा विनोद अपेक्षेप्रमाणे रंगला नाही आणि स्टुडिओत शांतता पसरली, तर अशा परिस्थिती हाताळण्यात कपिल शर्मा एकदम पटाईत आहे. तो वातावरण पुन्हा हलकंफुलकं करतो. त्यामुळे कार्यक्रमाचा फ्लो कायम राहतो आणि प्रेक्षकांचं मनोरंजन सुरू राहतं.