(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Aamir Khan love Jihad: बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan)सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. वयाच्या 61व्या वर्षी त्याने गौरी स्प्रॅटसोबत लग्न केल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही हिंदुत्ववादी संघटनांनी त्याच्यावर ‘लव्ह जिहाद‘चे आरोप केले आहेत. दुसरीकडे, काही मुस्लिम धर्मगुरूंनीही या विवाहावर आक्षेप घेत फतवा जारी केल्याचं वृत्त समोर आलं आहे.
या सर्व आरोपांवर आता आमिर खानने पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने आपल्या कुटुंबाचं उदाहरण देत आरोप फेटाळून लावले आणि आपल्या कुटुंबाची विचारसरणी नेहमीच सर्वधर्मसमभावाची राहिल्याचं सांगितलं.
वृत्तानुसार, आमिर म्हणाला, “माझ्या दोन्ही बहिणींनी हिंदू मुलांशी लग्न केलं आहे. माझ्या मुलीचंही लग्न हिंदू कुटुंबात झालं आहे. माझा चुलत भाऊ मन्सूर याने ख्रिश्चन महिलेशी विवाह केला आहे. आमच्या कुटुंबात धर्मापेक्षा नात्यांना अधिक महत्त्व दिलं जातं.”
आमिरने पुढे स्पष्ट केलं की, गौरी स्प्रॅट, रीना दत्ता किंवा किरण राव यांपैकी कोणालाही त्याच्याशी लग्न करण्यासाठी धर्मांतर करावं लागलं नाही. त्यांचे विवाह सिव्हिल मॅरेज पद्धतीने झाले असून गौरी ही हिंदू नसून ख्रिश्चन आहे. ती स्वतःच्या धर्माचं पालन करते आणि धर्मांतराचा प्रश्नच उद्भवत नाही, असंही त्याने स्पष्ट केलं.
दरम्यान, लग्नानंतर आमिर खान मुंबईतील पाली हिल परिसरात १०० कोटी रुपयांचा आलिशान ‘स्कायव्हिला’ उभारत असल्याच्या चर्चांनाही त्याने पूर्णविराम दिला. अशा वृत्तांचं खंडन करत त्याने सांगितलं की, नवीन बंगला किंवा स्कायव्हिला उभारला जात नसून त्यांच्या सध्याच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सचा पुनर्विकास सुरू आहे. हा निर्णय गृहनिर्माण सोसायटीतील सर्व सदस्यांनी एकमताने घेतला आहे.
आमिर खानच्या या स्पष्टीकरणानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं असून, काहींनी त्याच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे, तर काहींनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.






