
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘दंगल’ फेम दिग्दर्शक नितेश तिवारी सध्या त्यांच्या ४००० कोटी रुपयांच्या ‘रामायणम’ या चित्रपटामुळे चर्चेत असताना, त्यांची पत्नी आणि दिग्गज दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी यांनाही १००० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये आपला ड्रीम प्रोजेक्ट बनवायचा आहे. ‘नील बटे सन्नाटा’ आणि ‘बरेली की बर्फी’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या ४६ वर्षीय अश्विनी म्हणतात की, जर त्यांना मोठ्या बजेटच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली, तर त्यांना दीपिका पदुकोण, आलिया भट्ट आणि साई पल्लवी यांना एकत्र कास्ट करायला आवडेल. त्या याला आपला ड्रीम प्रोजेक्ट म्हणतात.
रेड लोरी फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी म्हणाल्या, “माझ्या विश लिस्टमध्ये अनेक नावे आहेत, पण सध्या दीपिका, आलिया आणि साई पल्लवी माझ्या विश लिस्टमध्ये आहेत. मला आशा आहे की त्या तिघीही माझे ऐकत असतील. मी हे प्रत्यक्षात आणत आहे आणि विश्वाला पाठवत आहे.”
Maatrubhumi: सलमान खानचे करिअर धोक्यात; टायटल बदलल्यानंतर 40 दिवस पुन्हा होणार चित्रपटाचं शूटिंग
आपल्या ड्रीम प्रोजेक्टबद्दल बोलताना, अश्विनीने चित्रपटसृष्टीतील लिंगभेदाच्या समीकरणावरही चर्चा केली. ती म्हणते, “एखादी स्त्री १०० किंवा १००० कोटी रुपयांचा चित्रपट का बनवू शकत नाही? तो फक्त पुरुष दिग्दर्शकानेच का बनवावा? माझ्या घरातही एक दिग्दर्शक आहे (पती नितेश तिवारी), पण तरीही.”
अश्विनी अय्यर तिवारी स्पष्ट करतात की, एखादा मोठा प्रकल्प करण्यासाठी केवळ एका सर्जनशील कल्पनेपेक्षा अधिक गोष्टींची आवश्यकता असते. त्यांच्या मते, प्रोडक्शन स्टुडिओचा भक्कम पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा असतो. त्या म्हणतात, “मी माझी कल्पना थेट विश्वात पाठवली आहे, कारण त्यासाठी एक व्यासपीठ, बजेट आणि इतर सर्व गोष्टींची गरज असते. आज कदाचित माझ्याकडे एखादी कल्पना असेल, पण जर स्टुडिओ गुंतवणूक करत असेल, तर त्यांच्याकडेही तितकाच आत्मविश्वास आणि एक दीर्घकालीन योजना असायला हवी. त्यामुळे, ही एक दुतर्फा प्रक्रिया आहे.”