
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
६ मार्च रोजी प्रदर्शित झालेला चित्रपट ‘तिघी’ आता यशस्वीपणे पाचव्या आठवड्यात प्रवेश करत आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद अजूनही कायम असून, चित्रपटाची लोकप्रियता टिकून राहिली आहे. चित्रपटात भारती आचरेकर, नेहा पेंडसे-बायस, आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका आहे. भावनिक कथानक आणि विषयप्रधान मांडणीमुळे चित्रपटाने प्रेक्षकांच्या हृदयात वेगळा ठसा उमटवला आहे.
तीन स्त्रियांच्या आयुष्यातील नातेसंबंध, त्यांच्या भावना आणि अंतर्गत संघर्ष यांचे वास्तववादी चित्रण प्रेक्षकांना भावत आहे. मोठ्या चित्रपटांची स्पर्धा असतानाही हा नाजूक आणि भावनिक चित्रपट ठामपणे उभा राहत, हाऊसफुल्ल प्रतिसादासह यशस्वीपणे सुरू आहे. त्यामुळेच चित्रपट प्रदर्शित होऊन काही आठवडे उलटूनही त्याबद्दल चर्चा सुरू असल्याचे दिसून येते. अनेक प्रेक्षक चित्रपटाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया देताना आणि इतरांनाही पाहण्याची शिफारस करताना दिसत आहेत.
समीक्षकांनीही ‘तिघी’ या विषयाला आणि सादरीकरणाला योग्य दाद दिली असून, चित्रपटाच्या मांडणीतील साधेपणा आणि प्रामाणिकपणा याकडे विशेष लक्ष वेधले आहे.
दिग्दर्शिका जीजिविषा काळे म्हणतात, “चित्रपट पाचव्या आठवड्यात पोहोचणे आणि त्यानंतरही प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळत राहणे, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. अनेक जण या कथेशी जोडले जात आहेत, हे समाधान देणारे आहे. प्रेक्षकांनी दिलेला हा पाठिंबा आम्हाला पुढेही अशा कथा सांगण्यासाठी प्रेरणा देणारा आहे.”
सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे-बायस यांच्या प्रमुख भूमिका असून, जीजिविषा काळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे-बायस यांनी केली आहे.