
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
स्टार प्रवाहवर नवीन सुरू झालेली मालिका वचन दिले तू मला, ही मालिका खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे. न्यायासाठी लढणारी, ध्येयवेडी आणि आत्मविश्वासू अॅडव्होकेट ऊर्जा शिंदे तिच्या आयुष्यातील पहिली महत्त्वाची केस लढण्यासाठी सज्ज होत आहे. पहिली केस लढण्यापूर्वी ऊर्जाने प्रसिद्ध सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. न्यायाच्या वाटेवर पाऊल टाकताना ऊर्जासाठी ही भेट अतिशय महत्त्वाची ठरली.
या भेटीविषयी सांगताना ऊर्जाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का सरकटे म्हणाली, ‘उज्वल निकम सरांना भेटून मनापासून आनंद झाला. त्यांनी दिलेला वेळ, प्रेमळ शब्द आणि आशीर्वाद माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. हा क्षण मी कायम लक्षात ठेवेन अशी भावना अनुष्काने व्यक्त केली.’
खास बाब म्हणजे, निष्णात वकील हर्षवर्धन जहागिरदार यांच्या विरोधात ऊर्जा न्यायालयात उभी राहणार आहे. ऊर्जाचा ही पहिली केस केवळ एक खटला न राहता, न्यायासाठीचा एक निर्णायक संघर्ष ठरणार आहे. या संघर्षात ऊर्जा स्वतःला कशी सिद्ध करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘वचन दिले तू मला’ ही मालिका स्टार प्रवाहवर सुरू झाली आहे. यात अभिनेत्री अनुष्का सरकटे मुख्य भूमिका साकारत आहे, तर अभिनेता इंद्रनील कामत वकीलाच्या भूमिकेत दिसतो; त्याच्या पात्राचे नाव शौर्य आहे. खास गोष्ट म्हणजे, मालिकेत मिलिंद गवळी खलभूमिकेत आहेत; तो ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरुद्ध देशमुखच्या भूमिकेसाठी ओळखला जातो.
ही मालिका 15 डिसेंबर रोजी पहिल्या एपिसोडसह प्रेक्षकांच्या भेटीस आली. ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या मालिकेनंतर स्टार प्रवाहवर ही मालिका सुरु झाली. अभिनेत्री अनुष्का सरकटे यापूर्वी ‘36 गुणी जोडी’ मालिकेद्वारे प्रसिद्ध झाली होती, जिथे तिच्यासोबत बिग बॉस मराठी फेम आयुष संजीव दिसला होता.