
Kerala Assembly Election : केरळात झाली तिरंगी लढत; आता राज्यातील जनतेचे डोळे निकालाकडे
तिरुवनंतपुरम : केरळमध्ये सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी, विरोधी संयुक्त लोकशाही आघाडी आणि भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांच्यात झालेल्या निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत आपले स्थान मजबूत करू पाहणाऱ्या या तीनही आघाड्यांसाठी हे निवडणुकीचे निकाल अत्यंत महत्त्वाचे आहेत.
केरळमध्ये एकूण २७१४२९५२ मतदार असून, त्यापैकी ७९.६३ टक्के मतदारांनी १४० विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान केले. राज्यातील १४० जागांसाठी एकूण ८८३ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने सांगितले की, मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. ४३ ठिकाणी १४० मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. मतमोजणीसाठी १५,४६४ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, ज्यात १४० निवडणूक अधिकारी, १,३४० अतिरिक्त निवडणूक अधिकारी, ४,२०८ सूक्ष्म निरीक्षक, ४,२०८ मतमोजणी पर्यवेक्षक आणि ५,५६३ मतमोजणी सहाय्यकांचा समावेश आहे.
या प्रक्रियेचा भाग म्हणून, निवडणूक आयोगाचे निरीक्षक, सुरक्षा कर्मचारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्रॉग रूम उघडण्यात येईल. एकूण मतांपैकी १.३६ टक्के असलेल्या पोस्टल मतपत्रिकांची मोजणी प्रथम केली जाईल. मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून, मतमोजणी केंद्रांच्या संरक्षणासाठी राज्य पोलिसांच्या जवानांसोबत केंद्रीय दलाच्या २५ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. कोणताही हिंसाचार टाळण्यासाठी पोलिसांनी राज्यभरात पाळत वाढवली आहे.
केरळसह पाच राज्यांचे निकाल आज
दुसरीकडे, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभेसाठी मतदान घेतले गेले होते. आता या निवडणुकीचे निकाल आज समोर येणार आहेत. हे निकाल देशाच्या राजकारणावर मोठा परिणाम करू शकतात. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचे सरकार बनले, तर विरोधक पुन्हा एकदा ‘भाजपमुक्त’ महाआघाडी बनवण्याचा प्रयत्न करू शकतात.
राहुल गांधी यांचं महत्त्वपूर्ण विधान
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आधीच ‘१६’ या आकड्याचा उल्लेख केला आहे. त्यांचा हा इशारा टीडीपी खासदारांच्या संख्येबाबत होता. त्यांनी यावर कोणतीही स्पष्टता दिली नसली, तरी त्यांनी आपले म्हणणे मांडले असल्याचे सांगितले आहे. याचा उलगडा येणाऱ्या काळात होऊ शकतो.