
PM Narendra modi and Amit Shah
Amit Shah : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनप्रमुख म्हणून 25 वर्षांची कारकीर्द पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अभियानाची माहिती देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोदींच्या 25 वर्षांच्या राजकीय आणि प्रशासकीय कारकिर्दीवर भाष्य करत मोठा दावा केला.
अमित शाह म्हणाले, “2014 पूर्वी देश भ्रष्टाचार, जातीवाद आणि परिवारवादाच्या विळख्यात अडकला होता. मात्र नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर या तिन्ही नकारात्मक प्रवृत्तींना आळा बसला,” असा दावा त्यांनी केला. आज भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून पुढे येत असून देशाची वाटचाल विकसित राष्ट्राच्या दिशेने सुरू असल्याचंही शाह म्हणाले.
मोदी यांनी आधी गुजरातचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधान म्हणून सलग 25 वर्षे शासनप्रमुखाची जबाबदारी सांभाळली. एवढ्या मोठ्या कालावधीत सातत्याने जनतेची सेवा करणं ही मोठी बाब असल्याचं अमित शाह यांनी नमूद केलं.
मोदींच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीनिमित्त भाजपकडून 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबवलं जाणार आहे. या महिनाभरात भाजपच्या वतीने 12 प्रमुख कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शाह यांनी दिली.
मोदी यांनी स्वतःला ‘प्रधान सेवक’ म्हणून संबोधत जनतेच्या सेवेला प्राधान्य दिलं, असंही शाह म्हणाले. त्यांच्या कार्यशैलीवर गुरुनानक यांच्या विचारांचा तसेच समर्थ रामदास स्वामींच्या ‘उपभोग शून्य स्वामी’ या संकल्पनेचा प्रभाव असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सेवा संकल्प अभियान अंतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातील… : सेवा दिवस
: माझ्या स्वप्नांचा भारत चित्र
: नमो सेवेच्या न ऐकलेल्या गोष्टी
: संगीतमय नाट्य सादरीकरण (स्थानिक भाषांमध्ये)
: अंगण मिलन सेवा
: सेवेची कथा
: सेवा ज्योती कलश यात्रा
: वडनगर ते वाराणसी सेवा… pic.twitter.com/FnIoFvLaKs — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 13, 2026
अमित शाह यांनी मोदी सरकारच्या काळातील आर्थिक आणि सामाजिक बदलांचाही उल्लेख केला. त्यांच्या दाव्यानुसार, देशातील 25 कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या वर आले असून भारताच्या विकासाला नव्या दिशेने गती मिळाली आहे.
तसंच मोदींच्या नेतृत्वामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची पत वाढली असून भारतीय पासपोर्टचं महत्त्वही वाढल्याचं अमित शाह यांनी म्हटलं. त्यामुळे मोदींच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेत भाजपकडून महिनाभर विविध सेवा उपक्रम राबवले जाणार आहेत.
‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका