'अमित शहा मुंबईत आले की...'; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका (File Photo)
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. अमित शाह मुंबईत आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला जातो आणि त्याचा फटका मुंबईकरांना बसतो, असा आरोप राऊत यांनी केला. गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यांवर मोठी गर्दी असताना सुरक्षेच्या कारणास्तव रस्ते बंद केले जात असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी विविध मुद्यांवरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ते म्हणाले, अमित शाह मुंबईत आले की त्यांच्या सुरक्षेचा मोठा ताण मुंबई पोलिसांवर पडतो. गणेशोत्सवाच्या काळात मंडप, मूर्ती आणि खरेदीसाठी नागरिकांची गर्दी असताना रस्ते बंद केल्याने मुंबईकरांना त्रास होतो. देशाचे गृहमंत्री म्हणून अमित शाह यांनी दिल्लीसह मणिपूर, आसाम आणि पश्चिम बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे, असे राऊत म्हणाले.
मुंबई दौऱ्यादरम्यान उद्योगपती आणि व्यावसायिकांच्या भेटींवरूनही राऊतांनी टीका केली. अमित शाह लालबागच्या राजाचे दर्शन घेणार असून त्यानंतर चिंचपोकळीच्या चिंतामणीचेही दर्शन घेणार असल्याचे सांगत, राऊतांनी उद्योगपतींशी संबंधित गणपतींच्या दर्शनावरूनही टोला लगावला.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर राऊत म्हणाले…
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या भूमिकेवर बोलताना संजय राऊत यांनी सरकारने त्यांच्याशी चर्चा करावी, अशी भूमिका मांडली. जरांगेंच्या भाषेवर सरकार आक्षेप घेत असेल, तर सभ्य आणि संस्कारी भाषेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांच्या मागण्याही सरकारने मान्य केल्या आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘सेवा संकल्प’ अभियानावर निशाणा
‘सेवा संकल्प’ अभियानावरही राऊतांनी सरकारवर टीका केली. मागील अनेक वर्षांत सरकारने नेमकी कोणाची सेवा केली, असा सवाल करत त्यांनी उद्योगपतींच्या हितासाठी सरकार काम करत असल्याचा आरोप केला.
ब्रिक्सच्या मेनूवरून टोला
ब्रिक्स परिषदेसाठी ठेवण्यात आलेल्या जेवणाच्या मेनूवरूनही संजय राऊत यांनी सरकारला टोला लगावला. आंतरराष्ट्रीय पाहुण्यांसाठी भारतीय खाद्यसंस्कृतीसोबत त्यांच्या आवडीचे पदार्थही असायला हवेत, असे ते म्हणाले. मेनूवरून त्यांनी उपरोधिक टिप्पणीही केली.
मंत्रालयातील कलशस्थापनेवर भूमिका
मंत्रालयातील धार्मिक विधींवर प्रत्येक गोष्टीला विरोध करता येणार नाही, असे राऊत म्हणाले. मात्र, सरकारने अंधश्रद्धेच्या पलीकडे जाऊन काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.






