
अमित शहांचा महाराष्ट्र दौरा की ‘मेवा संकल्प अभियान’? हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
Amit Shah Maharashtra Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अमित शहांच्या दौऱ्यावर जोरदार निशाणा साधत हा दौरा ‘सेवा संकल्प अभियान’ नसून ‘मेवा संकल्प अभियान’ असल्याची टीका केली आहे.
सपकाळ म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येऊन भाजपला राजकीय आणि आर्थिक फायदा कसा मिळवता येईल, याचाच विचार या दौऱ्यात होत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गंभीर असताना शेतकरी मोठ्या अडचणीत आहे, असं सांगत सपकाळ यांनी अमित शहांना थेट आव्हान दिलं. खरंच महाराष्ट्राची सेवा करायची असेल तर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी आणि हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका
तसंच महाराष्ट्रातील जमीन व्यवहारांवरूनही सपकाळ यांनी सरकारला सवाल केला. उद्योगपतींना कोणत्या जमिनी देण्यात आल्या, त्यातून किती पैसा उभा राहिला आणि या व्यवहारांमध्ये गैरव्यवहार झाला का, याचा हिशोब जनतेसमोर मांडला पाहिजे, असं ते म्हणाले.
कुंभमेळ्याच्या खर्चावरूनही त्यांनी सरकारला घेरलं. हजारो कोटींच्या खर्चाचा हिशोब जनतेला मिळायला हवा, अशी मागणी करत या पैशांमध्ये गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी सपकाळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवरही टीका केली. संघाचं सध्याचं ‘लिबरल’ रूप हे केवळ दाखवण्यासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. संविधान, तिरंगा आणि मुस्लिम समाजाबाबत संघाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.
विशेषतः सरसंघचालक मोहन भागवत यांनी या मुद्द्यांवर थेट खुलासा करावा, असं सपकाळ यांनी म्हटलं. त्यामुळे अमित शहांच्या दौऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकारणात भाजप-काँग्रेसमधील जुना संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हं दिसत आहेत.