
manoj jarange breaking fast
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं 20 दिवसांचं उपोषण अखेर 17 सप्टेंबरला स्थगित केलं. बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जरांगेंनी हा निर्णय घेतला. सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर पुढील आंदोलनाची भूमिका ठरवली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
या निर्णयानंतर आता जरांगेंचे जुने सहकारी अमोल खुणे यांनी जोरदार टीका केली आहे. विशेष म्हणजे, उपोषणाच्या सुरुवातीला सरकारच्या शिष्टमंडळाने वेळ मागितल्यानंतर ‘एक मिनिटही देणार नाही’ अशी भूमिका घेतली होती, मग आता तीन महिन्यांचा वेळ कसा काय दिला, असा सवाल खुणे यांनी उपस्थित केला.
अमोल खुणे यांनी पाटोदा येथे सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेवरही प्रश्न उपस्थित केले. ‘ED ची भीती वाटली म्हणून जरांगे पाटोद्यात थांबले’, असा दावा त्यांनी केला. तसेच आपल्यासह काही लोकांवर ED कारवाई होण्याची चर्चा असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
खुणे यांनी जरांगेंच्या आंदोलनाच्या पद्धतीवरही जोरदार टीका केली. ‘एक तरी मावळा कुठल्या मोहिमेवर रडत गेला का?’ असा सवाल करत त्यांनी जरांगेंवर बोचरी टिप्पणी केली. आंदोलनात नाट्यमयता आणली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
इतकंच नाही तर ‘मनोज जरांगे जर खरे असतील, तर माझ्यासमोर बसावं’, असं थेट आव्हानही अमोल खुणे यांनी दिलं. आपण चुकीचे ठरलो तर समाज देईल ती शिक्षा स्वीकारण्याची तयारी असल्याचंही त्यांनी म्हटलं.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केलं असलं तरी आंदोलन संपलेलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. सरकारला दिलेली तीन महिन्यांची मुदत आणि त्यानंतरची भूमिका याकडे आता मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष लागलं आहे.
Ans: