
Sushma Andhare
सोलापूर : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोलापूर दौऱ्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केलेले आरोप हे वस्तुस्थितीला धरून नसून राजकीय वैफल्यातून केलेले आहेत. सुषमा अंधारे यांचे राजकीय अस्तित्व संपले असून, स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी त्या भाजप आणि महायुतीच्या नेत्यांवर व्यक्तिगत टीका करीत आहेत, असा जोरदार पलटवार आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केला.
सुषमा अंधारे यांनी सोलापूर दौऱ्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर विविध आरोप केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, “अंधारे अक्का म्हणजे पंगतीला बसले आणि जेवण संपले, अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्या वैफल्यग्रस्त झाल्यामुळे अशा प्रकारची वक्तव्ये करीत आहेत.” राजकीय आणि सामाजिक जीवनात गुन्हे दाखल होणे ही काही नवीन बाब नाही. काही गुन्हे वैयक्तिक स्वरूपाचे असतात, तर काही वेळा राजकीय विरोधकांकडूनही जाणूनबुजून गुन्हे दाखल केले जातात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल आहे म्हणून त्याचा थेट राजकारणाशी संबंध जोडणे योग्य नाही, असेही कोठे यांनी स्पष्ट केले.
आमदारकी मिळेल, खासदारकी मिळेल, या अपेक्षेने काही जण शिवसेनेत गेले. मात्र त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. त्यांच्यानंतर राजकारणात आलेल्या सोलापूरच्या भीमकन्या ज्योती वाघमारे खासदार झाल्या. याचे शल्य त्यांच्या मनात असावे. त्यातूनच त्यांच्याकडून अशी वक्तव्ये होत आहेत,” असा टोला कोठे यांनी लगावला.
मुंबईत एकनाथ शिंदेंचा नवा प्लान? सचिन अहिरांकडे संघटनेची धुरा सोपवण्याच्या हालचालींना वेग
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि महायुती सोलापूरच्या विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहे. मात्र विरोधकांकडे विकासाच्या प्रश्नांवर बोलण्यासारखे काही नसल्याने ते व्यक्तिगत आरोप करण्याचा मार्ग स्वीकारत आहेत, अशी टीका आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केली.
“महायुतीसोबत अनेक नेते आणि कार्यकर्ते जोडले गेले आहेत. जयकुमार गोरे यांनी पक्षासाठी मोठे काम केले आहे. चार वेळा निवडून येत विविध स्तरांवर पक्षाला विजय मिळवून देणाऱ्या नेतृत्वावर केवळ राजकीय विरोधातून आरोप करणे योग्य नाही,” असे कल्याणशेट्टी म्हणाले.
सुषमा अंधारे यांच्या पक्षाच्या मुंबई महापालिकेतील कारभाराबाबतही आमदारांनी प्रश्न उपस्थित केला. “मुंबई महापालिकेत त्यांच्या पक्षाने काय केले, हे जनतेला चांगले माहिती आहे. जनतेपासून काहीही लपून राहिलेले नाही. त्यामुळे दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी स्वतःच्या पक्षाचा आणि स्वतःच्या मतदारसंघातील कामगिरीचा आढावा घ्यावा,” असा सल्ला कोठे यांनी दिला.
व्यक्तिगत टीका करून राजकारण करण्यापेक्षा विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जाण्याची भूमिका भाजपची आहे. सोलापूरच्या विकासासाठी महायुतीचे लोकप्रतिनिधी एकत्रितपणे काम करीत आहेत. त्यामुळे अंधारे यांच्या आरोपांना फारसे महत्त्व देण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“सुषमा अंधारे यांनी स्वतःचे राजकीय अस्तित्व आणि पक्षाची स्थिती तपासावी. सकाळ-संध्याकाळ आरोपांचे भोंगे वाजवून जनतेचा विश्वास मिळत नाही. कामाच्या माध्यमातून विश्वास निर्माण करावा लागतो,” अशा शब्दांत देवेंद्र कोठे यांनी अंधारेंवर टीकास्त्र सोडले.
यावेळी दोन्ही आमदारांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरील आरोप फेटाळून लावत, “अंधारे यांची वक्तव्ये निराधार असून ती राजकीय निराशा आणि वैफल्यातून आलेली आहेत,” असा दावा केला. महायुती सरकार विकासाच्या मुद्द्यांवर ठाम असून आगामी काळात सोलापूरच्या विकासासाठी आणखी प्रभावीपणे काम केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.