
विधान परिषदेतील जागांवरून महायुतीत वादंग
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद जागेवर भाजपने दावा केल्याच्या चर्चावर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनीही या जागेवर दावा केला आहे. ही जागा पूर्वीपासून शिवसेनेची आहे आणि पुढेही शिवसेनेचीच राहील. भाजपचे संख्याबळ कितीही असले तरी ही जागा आम्ही सोडणार नाही, असे ठामपणे त्यांनी सांगितले.
संजय शिरसाट म्हणाले, शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तालुकानिहाय बैठका घेतल्या जात असून, या मोहिमेचे नेतृत्व खासदार श्रीकांत शिंदे करत असल्याचे शिरसाट यांनी सांगितले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची तयारी सुरू आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केला असून, त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजितदादांच्या राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही आमदार आणि नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत असतानाच शिरसाट यांच्या दाव्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
नाशिकमधील जागेवरही दावा
विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीवरून महायुतीमधील अंतर्गत वाद आणि रस्सीखेच चव्हाट्यावर आली आहे. सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असलेल्या या जागेवर आता भाजपने अधिकृतपणे दावा ठोकला आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने ही जागा आम्हालाच मिळावी, अशी आक्रमक मागणी आहे.
शिवसेना शिंदे गटात आधीच अंतर्गत स्पर्धा
सध्या ही जागा शिंदेसेनेच्या ताब्यात असल्याने या जागेवर पुन्हा आपलाच उमेदवार असावा, यासाठी शिंदेसेनेचे स्थानिक नेते आग्रही आहेत. पक्षात उमेदवारीसाठी एकापेक्षा जास्त इच्छुक असल्याने आधीच पक्षात अंतर्गत स्पर्धा सुरू होती. त्यात आता भाजपने १९० जागांच्या संख्याबळाचा हवाला देत थेट दावा केल्यामुळे शिंदेसेनेच्या अडचणीत वाढ झाली आहे.
ठाणे-पुणे भाजप सोडणार?
जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवताना ठाणे आणि पुणे हा कळीचा मुद्दा ठरत आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपचे संख्याबळ आहे. तर येथे मित्रपक्षांनी दावा ठोकला आहे. ठाण्याची जागा एकनाथ शिंदे यांना पाहिजे पण तिथे भाजपचे संख्याबळ जास्त आहे. पुण्याची जागा सुनेत्रा पवार यांना पाहिजे पण तिथे भाजपचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे ठाणे आणि पुणे जागा भाजप सोडणार असल्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.