
Raju Shetti Sugar Price Hike, Sugar Price Increase India,
देशात साखरेचा पुरेसा साठा असताना झालेली दरवाढ राजू शेट्टी यांनी संशयास्पद मानली
दरवाढीचा लाभ शेतकऱ्यांना न मिळता व्यापारी आणि साठेबाजांना होणार असल्याचा आरोप
वाढीव दराचा फायदा देऊन कारखानदारांनी शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रुपये अतिरिक्त द्यावेत
Raju Shetti on Sugar Price Increase: साखरेचे दर वाढले तर माझ्यासारख्या नेत्याला आनंद झाला असता. मात्र, या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना नव्हे, तर व्यापाऱ्यांना होणार आहे. या फटका सर्वसामान्य ग्राहकांना जास्त बसणार आहे. अशी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, देशात साखरेच्या दरात अचानक झालेली दरवाढ संशयास्पद असल्याची शंकाही शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
देशभरात साखरेच्या दरात अचानक वाढ झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. देशात पुरेसा साखरेचा साठा उपलब्ध असताना दरवाढीची गरज काय, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला. या संदर्भात बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, यंदाच्या हंगामात दिवाळीपर्यंत पुरेल इतका सारखेचा साठा करण्यात आला आहे. त्याचबरोबर देशाची गरज भागवण्यासाठी पुढील हंगामात होणारे उत्पादनही पुरेसे असण्याची शक्यता आहे. असे असताना साखरेच्या दरात अचानक वाढ का करण्यात आली, असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला.
“साखरेच्या सध्याच्या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना दिल्यास कारखानदारांना शेतकऱ्यांना दुसरा हप्ता प्रति टन ५०० रुपये देणे शक्य होईल. असा दावा त्यांनी केला. साखर कारखानदारांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त करत शेट्टी म्हणाले की, “दरवाढीनंतर कारखानदारांकडून ‘साखर आधीच विकली आहे. मात्र, अनधिकृतपणे साठवून ठेवलेली साखर आता बाजारात विक्रीसाठी आणली जाऊ शकते. त्यामुळे साखर कारखान्यांच्या गोदामातून बाहेर पडणाऱ्या साखरेच्या साठ्यावर सरकारने बारकाईने लक्ष ठेवावे, अशी मागणी शेट्टी यांनी केली.
दरम्यान, देशांतर्गत बाजारातील वाढत्या साखरेच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने १० लाख टन कच्च्या साखरेच्या करमुक्त आयातीला परवानगी दिली आहे. ही आयात ‘टॅरिफ-रेट कोटा’ अंतर्गत ३१ ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहे.
सरकारने केवळ कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली असून, बाजारात विक्री करण्यापूर्वी तिचे शुद्धीकरण करून पांढरी साखर तयार केली जाणार आहे.
दरम्यान, ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी यांसारख्या सणांमुळे साखरेची मागणी वाढते. या काळात दर आणखी वाढू नयेत आणि बाजारातील पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी केंद्राने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.