
'थोडीशीही लाज उरली असेल तर अमित शाहांचा राजीनामा घ्या'; मल्लिकार्जुन खरगेंचा मोदींवर हल्लाबोल
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनानंतर आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारविरोधातील आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यापूर्वी गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही त्याच मागणीची पुनरावृत्ती करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत २० जुलै रोजी दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि पॅलेट गनच्या वापराचा उल्लेख केला. सरकारने विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.
‘आधी हाडं मोडलात, आता FIR दाखल करताय’; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल
खरगे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “दहा दिवसांपूर्वी, तुमच्या सरकारने काठ्या, दंडुके आणि पेलेट गनच्या साहाय्याने तरुणांचा आवाज दाबला. जेव्हा विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले, तेव्हा तुम्ही आता सूड म्हणून त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करत आहात आणि त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेत आहात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही या अटीवर तरुणांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. आता, तुमचे सरकार आपल्याच शब्दावरून फिरले आहे,” असे ते म्हणाले.
.@narendramodi जी, 10 दिन पहले, आपकी सरकार ने युवाओं का लाठी-डंडे-Pellet Gun से दमन किया। जब छात्रों ने अपना आंदोलन वापस ले लिया तो अब आप बदले की भावना से उनपर FIR करवा रहें हैं, जबरन हिरासत में ले रहें हैं। युवाओं ने आंदोलन इस शर्त पर वापिस लिया कि उनपर कार्रवाई नहीं होगी,… — Mallikarjun Kharge (@kharge) July 31, 2026
याशिवाय काही आंदोलनकर्त्यांची सोशल मीडिया खाती बंद केली जात असल्याचा तसेच काही महिला आंदोलनकर्त्यांची वैयक्तिक माहिती सार्वजनिक केल्याचा दावाही खरगे यांनी आपल्या पोस्टमध्ये केला. या घडामोडींमुळे सरकार सूडाच्या भावनेने कारवाई करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ते म्हणाले, “त्यांची सोशल मीडिया खाती ब्लॉक केली जात आहेत आणि मुलींची वैयक्तिक माहिती उघड केली जात आहे. तुमचा अहंकार इतका वाढला आहे की, गृहमंत्री अमित शाह यांनी संसद भवनात पाऊलही ठेवले नाही आणि उत्तरदायित्वावर विधान करण्यास ते घाबरले. आता, तुमची इज्जत वाचवण्याचे आणि प्रतिमा जपण्याचे हे सर्व डावपेच चालणार नाहीत; तरुणांनी तुमचे खरे रूप पाहिले आहे.”
Sanjay Raut PC: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले; संजय राऊतांचा घणाघात
गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणावर संसदेत निवेदन दिले नसल्याचाही मुद्दा उपस्थित करत खरगे म्हणाले की, आता प्रतिमा वाचवण्याचे प्रयत्न उपयोगाचे ठरणार नाहीत. देशातील तरुणांना वास्तव समजले असून त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
पोस्टच्या शेवटी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून, “थोडीशीही लाज उरली असेल तर अमित शाह यांचा राजीनामा घ्या,” अशी मागणी केली. या वक्तव्यानंतर विद्यार्थी आंदोलन, आंदोलनकर्त्यांवरील कारवाई आणि केंद्र सरकारची भूमिका या मुद्द्यांवर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.