
Satara Politics : खासदार गटाची आढावा बैठकीला दांडी; सातारा नगरपालिकेत नक्की चाललंय तरी काय?
सातारा : सातारा नगरपालिकेतील सत्ताधारी गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले असून, सर्वसाधारण सभेपूर्वी आयोजित आढावा बैठकीला अनेक नगरसेवकांनी दांडी मारल्याने ‘कुरघोड्यांचे’ राजकारण अजूनही संपलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सर्वांना एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले. मात्र, खासदार उदयनराजे भोसले गटातील बहुतांश नगरसेवक अनुपस्थित राहिल्याचे चित्र दिसले.
खासदार गटाचे उपनगराध्यक्ष अॅड. दत्ता बनकर, पक्षप्रतोद निशांत पाटील व काही नगरसेवक वगळता बहुतांश नगरसेवकांनी या बैठकीला दांडी मारल्याचे चित्र दिसल्याने गटबाजी अद्याप संपली नाही, आज संदेश या निमित्ताने गेला आहे.
राजकीय पार्श्वभूमी :
खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात अलीकडेच मनोमिलन झाले असून, दोघेही भाजपमध्ये सक्रिय आहेत. तरीही, स्थानिक पातळीवर त्यांच्या समर्थकांमध्ये एकजूट दिसून येत नाही. सातारा लोकसभा निवडणुकीनंतर उदयनराजेंची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकीय समीकरणांमध्ये सक्रियता कमी झाली आहे, त्याला अनेक कारणांचे पदर असले तरी सध्या उदयनराजे हे राजकीय विजनवासात आहेत.
सध्या शहर व तालुका राजकारणावर शिवेंद्रसिंहराजेंचा प्रभाव अधिक असून, पालिकेत अजूनही दोन स्पष्ट गट दिसून येतात. सातारा विकास आघाडी नगर विकास आघाडी या दोन्ही गटांतील राजकीय स्पर्धा पक्षीय राजकारणात मागे पडली असली तरी राजकीय कारणांच्या निमित्ताने ती वारंवार ऐरणीवर येत आहे. मलईदार ठेक्यांवरील ओढाताण यामुळे विकासाच्या मुद्द्यांवर दुय्यम भूमिका घेतली जात असल्याची टीका होत आहे.
नगरसेवकांनी बैठकीवर बहिष्कार टाकणे हा केवळ अनुपस्थितीचा मुद्दा नसून, तो संघटनात्मक शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. शिवेंद्रसिंहराजे यांनी ‘कुरघोड्या टाळा, विकासावर लक्ष द्या’ असे स्पष्ट आवाहन करूनही त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आलेला नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गटबाजीमुळे निर्णय प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच विकासकामे रखडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गटबाजीच्या प्रकरणाचा वेगळा संदेश जाऊन नागरिकांमध्ये नाराजी वाढण्याचा धोका आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, उदयनराजे भोसले यांनी पुन्हा सक्रिय होणे गरजेचे आहे. दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे नगरसेवकांमध्ये समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. अन्यथा पालिकेतील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता असून त्याचा विकास कामांवर परिणाम होऊ शकतो.
तळागाळातील गटबाजी अद्याप कायम
वरच्या पातळीवर मनोमिलन झाले असले तरी तळागाळातील गटबाजी अद्याप कायम आहे. साताऱ्याच्या विकासासाठी राजकीय कुरघोड्यांपेक्षा एकजूट अधिक महत्त्वाची ठरत असून, त्यासाठी ठोस नेतृत्वाची गरज अधोरेखित होत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा सातारा पालिकेत येऊन नगरसेवकांना पक्षीय राजकारणाच्या कानपिचक्या देणे आता गरजेचे बनले आहे. दोन्ही नेत्यांचे जर मनोमिलन असेल तर कार्यकर्त्यांमध्ये ते का होत नाही? यावर स्वतंत्र संशोधन करण्याची वेळ आली आहे.