
नगरपालिका विजयानंतर शिंदेंचा हुंकार; नवी मुंबई महापालिकेसाठी फुंकले रणशिंग (Photo Credit- X)
नवी मुंबईत ‘शिवसेना’ भक्कम: मोठे पक्षप्रवेश
यावेळी खासदार नरेश म्हस्के, नवी मुंबई मनपाचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, उपनेते विजय नहाटा, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, जिल्हाप्रमुख किशोर पाटकर, अंकुश कदम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेनेचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या सह अन्य विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये नामदेवराव भगत, शिवराम पाटील, रमाकांत म्हात्रे, मनोज हळदणकर, विजय माने आणि शीतल कचरे यांचा प्रामुख्याने समावेश होता.
शिवसेना हा मालक-नोकरांचा नव्हे, तर कार्यकर्त्यांचा पक्ष
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या निवडणुकांमध्ये ‘असली शिवसेना कोणाची’ याचा फैसला जनतेने केला आहे. महाविकास आघाडीचा एकत्रित आकडा सिंगल डिजिटमध्ये राहिला, तर शिवसेनेचा आकडा त्यापेक्षा अधिक आहे. लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकांनंतर आता महापालिकेतही महायुतीचाच भगवा फडकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “शिवसेना हा मालक-नोकरांचा नव्हे, तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जो काम करेल तोच पुढे जाईल,” असे ठामपणे सांगत त्यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. शिवसेना आता केवळ मुंबई-ठाण्यापुरती मर्यादित नसून चांदा ते बांधापर्यंत पोहोचली असल्याचे त्यांनी नमूद केले.
नवी मुंबईसाठी ‘गेम चेंजर’ प्रकल्प
नवी मुंबईसाठी अडीच वर्षांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. सिडकोची घरे, एफएसआय वाढ, टोल नाके हटवणे, पूल व रस्ते प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, ‘तिसरी मुंबई’ ग्रोथ सेंटर यांसारखे प्रकल्प नवी मुंबईसाठी गेम चेंजर ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लाडकी बहीण योजना, लखपती योजना, एसटी प्रवास सवलत, उच्च शिक्षण मोफत, शेतकरी सन्मान योजना यांचा उल्लेख करताना “कोई माई का लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही,” असे ठाम आश्वासन त्यांनी दिले.
कार्यकर्त्यांना विजयाचा ‘ॲक्शन प्लॅन’
महापालिका निवडणुकीत शाखा-शाखांमधून काम करा, नाराजी असल्यास संवादातून ती सोडवा आणि विकास हाच अजेंडा ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. “आरोपांना उत्तर कामातून द्यायचे आहे. गाफील राहू नका,” असा संदेश देत त्यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले. नवी मुंबईची ही निवडणूक शहराच्या विकासाचा आणि पुढील पिढ्यांच्या भवितव्याचा निर्णय करणारी असल्याने सर्वांनी एकदिलाने काम करून महायुतीचा विकासाचा भगवा फडकवावा, असे आवाहन करत त्यांनी भाषणाचा समारोप केला.
हे देखील वाचा: बार्शी नगरपरिषदेवर महायुतीचा झेंडा! नगराध्यक्षपदावर भाजप उमेदवार तेजस्विनी कथले विजयी