
Prakash Ambedkar slams Central Government over Air Force security to avoid NEET Paper leak,
NEET पेपरफुटीमुळे देशभरात संतापाचे वातावरण असतानाच विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. अश्यातच आता केंद्र सरकारने पेपरफुटी रोखण्यासाठी वायुसेनेची मदत घेतली जाणार आहे हे जाहीर केले. यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. केंद्राच्या या निर्णयाचा विरोध करत ‘हि कसली मूर्खता आहे?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
नीट परीक्षा पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य संधिया यांच्यासह सीबीएसई (CBSE) आणि एनटीएचे (NTA) वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नीट पेपरफुटी टाळण्यासाठी वायुसेनेची मदत घेतली जाणार आहे असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावरून आता प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारला चांगलेच फैलावर घेतले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून या निर्णयाचा विरोध केला. ते यावेळी म्हणाले, “हा काय मूर्खपणा आहे? खरंच, हा काय मूर्खपणा आहे? जर नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वाहून नेण्यासाठी हवाई दलाची गरज लागत असेल, तर हे भक्कम सुरक्षेचे लक्षण नसून, एका पूर्णपणे अयशस्वी परीक्षा प्रणालीचा जिवंत पुरावा आहे. नीट पेपरफुटी या प्रश्नपत्रिका वाहून नेणारे ट्रक सुरक्षित नसल्यामुळे होत नाहीत. त्या होत आहेत कारण भ्रष्टाचार व्यवस्थेत खोलवर रुजलेला आहे, यात अंतर्गत सूत्रधारांचा सहभाग आहे आणि प्रशासन व व्यवस्थेमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव आहे.”
ये कैसी मूर्खता है!? सच में, ये क्या मूर्खता है? अगर NEET परीक्षा के प्रश्नपत्रों को ले जाने के लिए वायुसेना की ज़रूरत पड़ रही है, तो यह मजबूत सुरक्षा का संकेत नहीं है, बल्कि एक पूरी तरह नाकाम परीक्षा व्यवस्था का जीता-जागता सबूत है। NEET पेपर लीक इसलिए नहीं हो रहे क्योंकि पेपर… https://t.co/KQht5c4gHD — Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) May 29, 2026
पुढे ते म्हणाले, “नीट परीक्षेच्या व्यवस्थापनासाठी हवाई दलाचा वापर करणे, हा मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी केलेला एक नाट्यमय डाव आहे. मी कल्पना करू शकतो की हा मूर्खपणा भाजप कार्यकर्ते आणि काही पत्रकारांना किती जास्त आवडेल. भारतीय हवाई दल देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आहे, भाजपची अकार्यक्षमता आणि शिक्षण मंत्रालयातील घोर भ्रष्टाचाराची भरपाई करण्यासाठी नाही! धर्मेंद्र प्रधान यांना लाज वाटायला हवी. २३ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य आणि करिअर उद्ध्वस्त करून राजीनामा देण्याऐवजी, ते लोकांचे लक्ष खऱ्या मुद्द्यावरून विचलित करण्यासाठी अशा मूर्खपणात गुंतले आहेत! अत्यंत लाजिरवाणे!” अश्या शब्दांत त्यांनी भाजपवर आगपाखड केली.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) १२ मे रोजी निर्णय घेतला होता की, वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेसासाठी ३ मे रोजी आयोजित करण्यात आलेली राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) पेपर लीकच्या आरोपांमुळए रद्द करण्यात आली आहे. आता ही पुन्हा परीक्षा २१ जून रोजी आयोजित केली जाणार आहे.