साताऱ्यात काँग्रेस आणि शरद पवार गटाचा सरकारविरोधी एल्गार, बैलगाडीतून आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
सातारा, दि. २९ प्रतिनिधी: वाढती महागाई, इंधन दरवाढ, शेतकऱ्यांचे प्रश्न, पेपरफुटीच्या घटना तसेच महिलांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने शुक्रवारी साताऱ्यात तीव्र आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या आंदोलनात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चाचे मुख्य आकर्षण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बैलगाडीतून केलेली प्रतीकात्मक एंट्री. इंधनाच्या वाढत्या किंमतींविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी हा अनोखा आंदोलनात्मक प्रयोग करण्यात आला. “सामान्य जनतेचे जगणे महागाईमुळे कठीण झाले आहे,” असा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.
शहरातील विविध भागांतून निघालेला मोर्चा घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. “महागाईला आळा घाला”, “शेतकऱ्यांना मदत द्या”, “पेपरफुटी रोखा”, “महिलांना सुरक्षा द्या” अशा घोषणा देत आंदोलकांनी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही कार्यकर्ते रस्त्यावर बसल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आणि वाहनांच्या रांगा लागल्या. “इंधन दरवाढ कमी करा”, “सामान्य जनतेला दिलासा द्या” अशा आशयाचे फलक कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते. वाढत्या पेट्रोल-डिझेल दरामुळे महागाईत मोठी भर पडत असून सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी नागरिकांना मेलडी चॉकलेटचे वाटप करून केंद्रातील मोदी सरकारच्या इंधन दरवाढीच्या धोरणाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत विविध नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका करत इंधनावरील कर कमी करण्याची मागणी केली.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचेही पाहायला मिळाले. शशिकांत शिंदे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी हटविण्याचा प्रयत्न केल्यानंतर आंदोलन अधिकच आक्रमक झाले.
यावेळी शशिकांत शिंदे यांनी सरकारवर निशाणा साधताना सांगितले की, “राज्यातील नागरिक महागाई, बेरोजगारी आणि अन्य समस्यांनी त्रस्त आहेत. शेतकरी, युवक आणि महिलांच्या प्रश्नांबाबत शासन गांभीर्याने निर्णय घेत नाही. त्यामुळे जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे.” आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राष्ट्रवादी शरद पवार गटाने आगामी काळातही जनतेच्या प्रश्नांवर आंदोलनाची भूमिका कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत.
जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील म्हणाले, “पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि वाहतूक व्यवसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. केंद्र सरकारने तातडीने इंधन दरवाढ नियंत्रणात आणून जनतेला दिलासा द्यावा.” या आंदोलनामुळे काही काळ परिसरात वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिस बंदोबस्तात मोर्चा शांततेत पार पडला.
‘मनोज जरांगेंना आरक्षण अन् लोकशाहीचं शून्य ज्ञान’; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल






