
पवनराजे हत्याकांडात निर्दोष मुक्ततेनंतर राणाजगजितसिंह पाटील यांची पहिली प्रतिक्रिया; 'हे राजकीय कारस्थान होते'
‘शिंदे गटात जाण्याबाबत निर्णय..,’ कोर्टाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर घेणार मोठा निर्णय
राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाच्या टप्प्यांवर हे प्रकरण समोर आले. नव्वदच्या दशकात ते मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार होते आणि वरिष्ठ नेतृत्वाकडून त्यांना त्याबाबत सकारात्मक संकेत मिळाले होते. त्यानंतर २००९ मध्ये खासदार असताना त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची चर्चा सुरू होती. मात्र त्याच काळात पवनराजे निंबाळकर व समद काजी हत्या प्रकरणात त्यांना गोवण्यात आले, असा दावा त्यांनी केला.
या प्रकरणामुळे पाटील कुटुंबाला गेली वीस वर्षे मोठा मानसिक, सामाजिक आणि राजकीय त्रास सहन करावा लागला. न्यायालयीन लढाईमुळे सार्वजनिक जीवनावरही त्याचा परिणाम झाला. वाढते वय आणि प्रकृती अस्वास्थ्य यामुळे डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या सार्वजनिक जीवनातील सक्रियता कमी झाली असून, या संपूर्ण प्रकरणाने त्यांना मोठा मनस्ताप दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करताना राणाजगजितसिंह पाटील यांनी हा न्याय सत्याचा विजय असल्याचे सांगितले. संकटकाळात खंबीरपणे साथ देणारे कार्यकर्ते, समर्थक आणि हितचिंतक यांचे त्यांनी आभार मानले. तसेच कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या आशीर्वादामुळे आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वासामुळे अखेर न्याय मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मुंबई सत्र न्यायालयाच्या निकालानंतर या बहुचर्चित प्रकरणावरील राजकीय आणि सामाजिक चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले असून, पाटील कुटुंबाकडून या निकालाला न्यायाचा विजय म्हणून संबोधले जात आहे.