'निवडून तुम्ही दिलं, जाब विचारण्याचा अधिकार तुमचाच', फुटीर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना थेट आवाहन
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 60 व्या वर्धापनदिन मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला. ‘ऑपरेशन टायगर‘ अंतर्गत ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात गेल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मेळाव्यात ठाकरे यांनी शिवसैनिकांना थेट आवाहन करत बंडखोर खासदारांना जाब विचारण्याचे आवाहन केले.
षण्मुखानंद सभागृहातील मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “या खासदारांना निवडून आणण्यासाठी मेहनत तुम्ही केली, मतं तुम्ही दिलीत. मग जाब विचारण्याचा अधिकार तुम्ही का सोडताय? तुम्हीच त्यांना जाब विचारा.” ते पुढे म्हणाले, “आदेश काय देऊ? निवडून तुम्ही दिलं, मेहनत तुम्ही घेतली. जाब विचारण्याचा अधिकार तुमचाच आहे. त्यांना विचारा की त्यांनी जनतेचा आणि शिवसैनिकांचा विश्वास का तोडला?”
फुटीर खासदारांवर निशाणा साधताना ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, मात्र खासदारांचे ‘हमीभाव’ ठरवले जात आहेत. “तुम्ही मरमर मेहनत करायची आणि काही जण खोक्यांच्या राजकारणात रमायचे, हे महाराष्ट्राला मान्य होणार नाही,” अशी टीका त्यांनी केली.
राज्य सरकारवर हल्लाबोल करताना ठाकरे म्हणाले, “निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना आणली, पण आता लाखो महिलांची नावे यादीतून वगळली जात आहेत. जनतेला आश्वासनं देऊन फसवण्याचं काम सुरू आहे.”
भाषणादरम्यान ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीतील एका शेतकऱ्याचा प्रसंग सांगितला. ते म्हणाले, “एक शेतकरी माझ्याकडे छोटा बटवा घेऊन आला आणि म्हणाला, हा पैसा उमेदवारासाठी आहे. त्या प्रेमाने दिलेल्या मदतीमुळे आपण निवडणूक जिंकलो. समोर पैशाचा महापूर होता, पण सामान्य माणूस शिवसेनेसोबत उभा राहिला.”
‘मी भेटत नव्हतो तर गधड्या तू निवडून कसा आला?’; ओमराजे निंबाळकरांवर उद्धव ठाकरेंचा पलटवार
बंडखोर खासदारांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “इतिहासात गद्दारीचा शिक्का सहज पुसला जात नाही. महाराष्ट्राच्या विश्वासाशी केलेली बेईमानी जनता विसरणार नाही.” ऑपरेशन टायगरनंतर झालेल्या या पहिल्याच मोठ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदार, राज्य सरकार आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करत आगामी राजकीय संघर्षाचे संकेत दिले.






