
'भाजपाची डेडलाईन जवळ आली'; प्रशांत किशोरांच्या विजयावर रोहित पवारांचा हल्लाबोल
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांच्या विजयाचे स्वागत करत भाजपवर जोरदार टीका केली आहे. फेसबुकवर केलेल्या सविस्तर पोस्टमध्ये त्यांनी प्रशांत किशोर यांचे अभिनंदन करताना भाजपच्या राजकीय भवितव्यावरही भाष्य केले आहे.
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या पारंपरिक मतदारसंघात मतदारांनी प्रशांत किशोर यांना विजयी करून भाजपला मोठा धक्का दिला आहे. प्रत्येक राजकीय पक्षासाठी एक वेळ निश्चित असते आणि या निकालाने भाजपाची ती वेळ आता जवळ आल्याचे स्पष्ट झाले आहे, असा दावा त्यांनी केला.
प्रशांत किशोर यांचे अभिनंदन करताना रोहित पवार यांनी, “भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या पारंपरिक मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत मतदारांनी जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांना विजयी करुन भाजपाचं नाक कापलं. प्रत्येक गोष्टीला एक ‘डेडलाईन’ असते आणि भाजपाची ती डेडलाईन आता जवळ आली आहे, हेच या निकालाने दाखवून दिलं आहे. भाजपच्या गडात घुसून भाजपलाच पाणी पाजल्याबद्दल प्रशांत किशोर यांचं मनःपूर्वक अभिनंदन! आता पूर्वीसारखं ‘अपना टाईम आएगा’ असं नाही तर ‘अपना टाईम आ गया..’ त्यामुळं थोडा धीर धरा…. विजय आपलाच आहे..!” असा संदेशही त्यांनी आपल्या पोस्टमधून दिला.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या पारंपरिक मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत मतदारांनी जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांना विजयी करुन भाजपाचं नाक कापलं. प्रत्येक गोष्टीला एक ‘डेडलाईन’ असते आणि भाजपाची ती डेडलाईन आता जवळ आली आहे, हेच या निकालाने दाखवून दिलं आहे.… pic.twitter.com/8Dbl9OR0oG — Rohit Pawar (@RRPSpeaks) August 3, 2026
याच पोस्टमध्ये त्यांनी डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाबाबतही राजकीय अंदाज व्यक्त केला. दिल्लीतील जंतर-मंतरवरील युवकांच्या आंदोलनाचा उल्लेख करत आणि बांकीपूरमधील भाजपच्या पराभवाचा संदर्भ देत त्यांनी संसदेत डिलिमिटेशन विधेयक मंजूर होण्याची शक्यता कमी असल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या मते, असे झाल्यास तो लोकशाहीचा विजय ठरेल. ते म्हणाले,”आता मला वाटतंय डिलिमिटेशन बिल काही पास होणार नाही. दिल्लीत जंतरमंतरवर झालेलं तरुणाईचं आंदोलन आणि बांकीपूरमध्ये झालेला दारूण पराभव बघितला तर संसदेत डिलीमिटेशन बील मंजूर होणार नाही असंच दिसतंय… आणि निश्चितच हा लोकशाहीचा विजय असेल!”
दरम्यान, बिहारमधील बांकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार यांचा 18,953 मतांनी पराभव केला. अंतिम निकालानुसार, प्रशांत किशोर यांना 63,203 मते, तर भाजपचे नीरज कुमार यांना 44,250 मते मिळाली. राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवार रेखा गुप्ता या 14,085 मतांसह तिसऱ्या स्थानावर राहिल्या.
गेल्या तीन दशकांपासून बांकीपूर मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व होते. त्यामुळे या पोटनिवडणुकीतील निकालाला केवळ एका मतदारसंघाचा निकाल म्हणून नव्हे, तर बिहारच्या बदलत्या राजकीय समीकरणांचा महत्त्वाचा संकेत म्हणून पाहिले जात आहे. अशा पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्या फेसबुक पोस्टनेही राजकीय चर्चांना नवे परिमाण मिळाले असून, त्यांच्या विधानांवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून पुढे काय प्रतिक्रिया येतात, याकडे आता लक्ष लागले आहे.