
Sanjay Raut Press Conference, Amit Shah Pune Visit Opposition,
Sanjay Raut PC: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले आहेत. त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेले आहेत, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टिकास्त्र डागले. ते आज सकाळी माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अँटी पेपर लीक विधेयक 2026 वर राज्यसभेत चर्चा झाली, सर्वांनी आपापली मते मांडली. पण जंतरमंतर वरील विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, टिअर गॅस-नळकांडी फोडली, पॅलेट गन वापरल्या, मुलं जखमी झाली. हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, संसदेवर धडकले. पण विद्यार्थी आणि परिषदेवर बोलणारे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्रीच संसदेत उपस्थित नव्हते. ज्या खात्याशी संबंधित नाहीत, असे मंत्री उत्तर देत असल्याने विरोधकांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
मला आश्चर्य वाटते की, वंदे मातरम विधेयकासाठी तुम्ही एक विशेष अधिवेशन घेता, ते चर्चेला आले तेव्हा पंतप्रधान चर्चेसाठी उपस्थित नव्हते. मग राष्ट्रभक्तीचे ढोंग लावले आहे. तुम्ही अधिवेशन घेता, काँग्रेसवर टिका करण्यात एक तास घालवला आणि विधेयक मंजुरीला आल्यावर पंतप्रधान मोदी, आणि अमित शाहा संसदेत नसतात, अशी टिकाही संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत म्हणाले की, “लोकमान्य टिळक यांच्यासारख्या स्वातंत्र्यलढ्यातील कर्त्या पुरुषाने स्वाभिमानाने, अभिमानाने आणि शौर्याने ईस्ट इंडिया कंपनीशी दोन हात केले. तुरुंगवास भोगला, त्यांच्या नावाचा पुरस्कार सध्याच्या ‘ईस्ट इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक’ अमित शहा यांच्या हस्ते देण्याचा घाट ज्यांनी घातला असेल, त्यांच्या बुद्धीची मला कीव येते. पुणेकरांनी त्यांना विरोध करायचं ठरवलेलं आहे. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली आहे, ही पुन्हा एकदा साम्राज्यशाही आहे. नैतिकदृष्ट्या हे अध:पतन आहे.
जंतरमंतरवर हुकूमशाहीविरुद्ध लढणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांना ठेचून मारण्याचा प्रत्नन झाला. ते आदेश गृहमंत्री अमित शाहांचे होते. त्यांच्या हस्ते टिळक पुरस्कर दिला जातो, हे सगळ घडत असताना जे गप्प राहिले, त्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना दिला जातो, अशी टिकाही संजय राऊत यांनी केली आहे.
जंतरमंतरवरील विद्यार्थ्याच्या हाताचे ठसे घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, चंद्रकांत दादा हे उच्चशिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री आहेत. त्यात विज्ञान वगैरे विषय येतात. चंद्रकांत पाटील यांनी हे जे नवं संशोधन केलेलं आहे, आंदोलनतील दगड, त्यावरचे ठसे घेतले जातील आणि ठसे आधार कार्डला लिंक कऱणार असल्याचे म्हटलं आहे. चंद्रकांत पाटलांना त्यांच्या शोधाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीला एक शिफारस केली पाहिजे. असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.