
पवार आले... पण ‘भाकरी फिरली’ नाही !
सातारा : साताऱ्याच्या राजकारणात शरद पवार यांचा दौरा म्हणजे नेहमीच राजकीय भूकंपाची चाहूल मानली जाते. “भाकरी फिरणार”, “मोठे बदल होणार”, “राजकीय संकेत मिळणार” अशा चर्चांनी जिल्ह्याचे वातावरण पेटून उठते. मात्र, यंदाचा दौरा पूर्णपणे वेगळा ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार साताऱ्यात आले, रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा विराजमान झाले आणि कोणतेही राजकीय संकेत न देता थेट मुंबईकडे रवाना झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक अर्थ लावले जाऊ लागले आहेत.
रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी 2026 ते 2029 या कालावधीसाठी त्यांची पुन्हा निवड झाली. या निवडीवेळी पवारांनी राजकारणाचा एकही धागा पकडला नाही. उलट रयतच्या भविष्यातील तंत्रज्ञानाधिष्ठित वाटचालीवर भर देत शिक्षण क्षेत्रातील बदलत्या आव्हानांवर भाष्य केले. त्यामुळे “पवारांच्या शांततेतही संदेश असतो” असे मानणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि संभ्रम दोन्ही दिसून आले.
दरम्यान, अजित पवार गट आणि शरद पवार गटातील संबंधांबाबत सातत्याने चर्चा सुरू असतानाही शरद पवार यांनी यावर पूर्ण मौन बाळगले. अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही गटांमध्ये निर्माण झालेला भावनिक संवाद आणि संघर्षाऐवजी समांतर राजकीय प्रवासाची दिसणारी भूमिका यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता पवारांनी अत्यंत सूचक भूमिका घेतली. “एकीकरण” या चर्चेपासून त्यांनी जाणीवपूर्वक अंतर ठेवले, हे विशेष मानले जात आहे.
साताऱ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाची संघटनात्मक उभारणी हा सध्या मोठा राजकीय विषय आहे. सत्ता नसताना संघटना जिवंत ठेवणे आणि नव्या पिढीला जोडणे हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे पवारांचा सातारा दौरा कार्यकर्त्यांसाठी दिशादर्शक ठरेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आता ही जबाबदारी प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शशिकांत शिंदे आणि जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या खांद्यावर स्पष्टपणे सोपवण्यात आल्याचे चित्र दिसून आले.
विशेष म्हणजे आजारपणातून सावरल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच साताऱ्यात दाखल झाले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. तुतारीच्या गजरात, फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचे जोरदार स्वागत केले. सत्ता नसली तरी कार्यकर्त्यांच्या मनात पवारांविषयी असलेली निष्ठा आजही अबाधित असल्याचे यावेळी दिसून आले.
खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांची उपस्थितीही यंदाच्या दौऱ्याचे विशेष आकर्षण ठरली. अधिकृत कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेचा असला तरी राजकीय चर्चांचे केंद्र त्यांच्या भोवतीच फिरताना दिसले. सुप्रिया सुळे यांनी शेतकरी, महिला आणि वाढत्या अत्याचारांच्या प्रश्नावर सरकारला लक्ष्य केले, तर रोहित पवार यांनी विरोधकांवर थेट हल्लाबोल करत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.
एकीकडे शरद पवारांची शांतता आणि दुसरीकडे पुढील पिढीची आक्रमक शैली या दोन भिन्न छटांनी साताऱ्यातील राष्ट्रवादीचे बदलते चित्र स्पष्ट केले. देशाच्या राजकारणात मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारलेल्या शरद पवारांनी आता प्रत्यक्ष राजकीय संघर्षाची धुरा नव्या नेतृत्वाकडे सोपवण्यास सुरुवात केल्याचे संकेत या दौऱ्यातून मिळत आहेत.
साताऱ्यात पवार आले, स्वागत झाले, गर्दी झाली… पण यावेळी कोणतीही “राजकीय भाकरी” फिरली नाही. मात्र, पवारांच्या शांततेतूनच नव्या राजकीय पर्वाची चाहूल कार्यकर्त्यांना मिळाली, एवढे मात्र नक्की.