
फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मातील पूजाविधीत वापरल्या जाणाऱ्या गुलाल, विभूती, अष्टगंध आणि चंदन या घटकांना अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण स्थान आहे. प्रत्येक घटकाचा वापर देवपूजेत विशिष्ट कारणासाठी केला जातो. यासोबतच याचा आरोग्यासाठी देखील फायदा होतो, कसा ते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या
गुलाल हा उत्सवात वापरण्याची प्रथा आहे. विविध समारंभात गुलाल उधळला जातो. गुलाल हे आनंद आणि प्रेम याचेही प्रतीक आहे. होळी सणात गुलाल वापरला जातो. मुख्यत: राजकीय कार्यक्रमात गुलाल उधळला जातो. रासायनिक गुलाल हा मर्कुरी सल्फेटपासून बनवतात. रासायनिक गुलालामुळे त्वचा रोग, अस्थमा किंवा कॅन्सर सारखे रोग होऊ शकतात. त्यामुळे नैसर्गिक गुलाल वापरण्यास प्राधान्य दिले पाहिजे.
शेंदूर हा ग्रामीण भागात दगडाच्या मूर्तींचे मांजन करण्यासाठी वापरली जाते. विशेषतः मारुती, गणपती, म्हसोबा आणि ग्रामीण देव देवता यांच्या मूर्तींना शेंदूर वापरला जातो. शेंदूर हा तेलात ओला करून वापरतात. शेंदूर हा शास्त्रीयदृष्ट्या लाल रेड ऑक्साईड आहे. सेंदूर आणि सिंदूर यात फरक आहे हे लक्षात ठेवावे.
विभूती ही सफेद असून अनेक पंथामध्ये ती कपाळाला आणि अंगाला लावली जाते. विभूती हे एक भस्म म्हणून त्यावर बोटे घासून ती अंगाला लावतात. विभूती ही कपाळ, मान आणि छाती या ठिकाणी लावण्याचा प्रघात आहे. शिव पंथात विभूती लावली जाते. विशेषतः लिंगायत पंथामध्ये या विभूतीचा वापर धार्मिक कार्यक्रम व पूजा यामध्ये केला जातो. विभूती लावली तर सकारात्मक भाव निर्माण होतो तसेच मानसिक शांतता प्राप्त होते असे अध्यात्म सांगते. विभूती ही लाकूड व गाईचे शेण यांना जाळून एका विशिष्ट अशा प्रक्रियेने तयार केली जाते. एकंदर विभूती ही गाईच्या शेणाला जाळून तयार केलेली राख असून तीला पवित्र स्थान आहे. शास्त्रीय दृष्ट्या विभूति शरीरावर लावली तर ती विविध रोग जंतू पासून शरीराचे संरक्षण करते.
अष्टगंध हा आठ प्रकारची जड़ी किंवा सुगंध मिसळून केला जातो. अष्टगंधामध्ये आठ पदार्थ असतात- चंदन, केशर , कापूर, अगर , जटामांसी , कुमकुम , गोरोचन , कचूर .असे मानले जाते की हे आठ पदार्थ सर्व ग्रहांना शांत करतात. त्याचा वापर करून ग्रहांचे दुष्प्रभाव कमी होतात असे अध्यात्म शास्रात मानले जाते. असा हा अष्टगंध टिळा म्हणून कपाळावर लावला जातो. असे मानले जाते की ते अष्टगंध नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि सकारात्मकता वाढवतो. अष्टगंधामुळे मन शांत आणि स्थिर होते.
चंदनला अध्यात्मिक दृष्टीने अत्याधिक महत्त्व आहे.चंदन उगाळून कपाळाला नाम काढतात. चंदनाचा टिळा शुभ कार्यात लावतात. देवाच्या मूर्तीला सुद्धा चंदनाचा लेप लावतात. चंदन लावल्याने थंडावा तयार होतो आणि तणाव कमी होतो.
अशा प्रकारे कुंकू, हळद, बुक्का ,शेंदूर, गुलाल, विभूती, अष्टगंध आणि चंदन हे ग्रामीण संस्कृती व अध्यात्म यांचे महत्त्वाचे अंग आहे. अध्यात्मिक नाही तर शास्त्रीय दृष्टिकोणातूनही या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मानवी जीवन हे काही अंशी शांत, संयमी, स्थिर आणि तणावमुक्त करण्यात कुंकू, हळद, बुक्का ,शेंदूर, गुलाल ,विभूती, अष्टगंध आणि चंदन हे प्राचीन काळापासून उपयोगी ठरले आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)