
फोटो सौजन्य- chatgpt
सोळाव्या शतकाच्या ज्या कालखंडात हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हातात जाणतेपणी शस्त्र धरले, एकेक गाव – एकेक मावळा जोडत महाराष्ट्रधर्म वाढविला, त्याच कालखंडात समर्थ गावोगावच्या तरुणांना शक्ती-बुद्धी-युक्तीची उपासना हनुमंताच्या माध्यमातून शिकवीत होते. हा केवळ योगायोग नव्हता. महाराजांमध्ये समर्थांना श्रीराम दिसत होते, तर त्यांच्या जिवाला जीव देणारे मावळे प्रत्यक्ष मारुतीचे रूप. शिवाज्ञा शिरोधार्य मानून अन्यायाविरुद्ध तुटून पडणारे सारे मावळे हे हनुमंतस्वरूप होते.
महाराष्ट्राच्या सातारा, सांगली आणि कोल्हापूर परिसरात समर्थांनी अकरा मारुती स्थापन केले, जे अतिशय प्रसिद्ध आहेत. चाफळ इथे स्थापन केलेल्या दास आणि प्रताप मारुतीच्या स्थानापासून नजीक अंतरावर ही मारुती मंदिरांची मालिका आहे. इतक्या कमी अंतरावर इतकी देवालये, तीही मारुतीची यामागे समर्थांची काही विशिष्ट योजना असली पाहिजे.
चाफळक्षेत्रीचे दोन मारुती – प्रभू श्रीराम यांनी समर्थांना दिलेल्या दृष्टांतानुसार त्यांना अंगापूरच्या डोहातून प्रभू रामचंद्राची मूर्ती मिळाली. सन 1648 साली चाफळ इथे श्रीराम मंदिर उभे राहिले. पुढे कोयनेच्या भूकंपात या राम मंदिराची पडझड झाली होती. परंतु त्याची पुन्हा बांधणी करण्यात आली. चाफळ इथे समर्थांनी श्रीरामांच्या सन्मुख दास मारुतीची स्थापना केली आहे. दास्यभक्ती म्हणजे देवाच्या सख्यत्वासाठी, पडो जिवलगांशी तुटी. भक्तीच्या या आविष्कारात कुठेही गुलामीचा हीन भाव नसून भक्ताचा आराध्य दैवतावर संपूर्ण विश्वास आणि मनात सर्वशरणभाव असणे अभिप्रेत आहे. समर्थ हे स्वत: रामभक्त हनुमंतरूप होते आणि श्रीरामचरणी ते दास्यभक्तीनेच लीन झाले होते.
या मारुतीला खडीचा मारुती/चपेट मारुती असे संबोधन आहे. समर्थांनी 1650 साली याची स्थापना केली. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ यांची भेट घडली होती, अशी आख्यायिका सांगितली जाते. शिंगणवाडीपासून सुमारे 15 कि.मी. अंतरावर एका उंच टेकडीवर रामघळ आहे. समर्थांनी रामघळीत बराच काळ आध्यात्मिक चिंतन-मनन केले. याच ठिकाणी शिवरायांची तहान भागविण्यासाठी त्यांनी कुबडी उलथून खालचे पाणी प्रवाहित केले, असे सांगतात. ही जागा कुबडीतीर्थ म्हणून ओळखली जाते.
चाफळपासून तीन कि.मी. अंतरावर माजगावचा मारुती आहे. माजगावच्या वेशीवर पूर्वी घोड्याच्या आकाराचा एक गावरक्षक धोंडा ठेवलेला असे. त्याची पूजाही होत असे. गावकरी लोकांनी समर्थांना या देवतेची विधिपूर्वक प्रतिष्ठापना करण्याची विनंती केली, तेव्हा या धोंड्यावर आकार कोरून त्याला समर्थ रामदास यांनी मारुतीचे रूप दिले. हा मारुतीदेखील चाफळसंमुख असून मारुतीचे व्यवस्थापनही चाफळ येथूनच केले जाते. माजगावचे आज दिसणारे मंदिर श्रीधरस्वामी यांनी उभारलेले आहे. मंदिराच्या भिंतीवर उड्डाण करणार्या मारुतीचे उत्तम चित्र रेखाटले आहे.
वाळवा तालुक्यात कृष्णा नदीच्या रामलिंग बेटावर वसलेले मारुतीचे क्षेत्र म्हणजे बाहे बोरगाव हे निसर्गरम्य ठिकाण आहे. इथला मारुती दोन बाहू पसरून उभा आहे, हे इथले वैशिष्ट्य. असे म्हणतात की रावणाचा वध करून श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाईसह या स्थानी आले असताना दोन्ही बंधू कृष्णास्नान करायला गेले. त्यानंतर शिवपिंडीची पूजा करताना कृष्णा नदीचे पाणी पुष्कळ वाढले. सीतामाईला याचा त्रास होऊ नये, म्हणून मारुतीने आपले दोन्हीही बाहू विस्तारले आणि नदीचा प्रवाह अडविला. त्या वेळी नदी विभागली आणि मध्ये बेट तयार झाले, तेच हे रामलिंग बेट.
इथला मारुती सन 1645 साली स्थापित झाला. ही मूर्ती चुन्याची आहे, म्हणून तिला चुन्याचा मारुती असेही म्हणतात. या मारुतीच्या मस्तकी गोंड्याची टोपी आहे. रूप उग्र आहे. मारुतीची कथा मोठी रंजक आहे. शहापूर गावालागत चंद्रगिरी डोंगरावर समर्थ मुक्कामाला असताना या गावच्या बाजीपंत कुलकर्णी यांच्या घरीही ते भिक्षा मागायला जात असत. परंतु बाजीपंतांच्या पत्नी सतीबाई समर्थांना कधीही भिक्षा वाढत नसत आणि वर गोसावडा म्हणून हेटाळणी करत असत. एकदा कुळकर्णी यांना तिथल्या मुसलमान अंमलदाराने हिशोब चुकल्याचे कारण सांगून अन्यायाने अटक केली आणि शिपाई त्यांना घेऊन विजापूरला निघाले. त्या वेळी समर्थांनी शहापुरात चुन्याचे मारुतीराय घडविले आणि या संकटातून सोडविण्यासाठी हनुमंताचा धावा आरंभला. कुळकर्णी सुटून परत आले. परिणामी कृतज्ञभावाने कुलकर्णी कुटुंब व गावकरी मारुतीचे निस्सीम भक्त झाले.
हे गाव नागपंचमीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. समर्थांनी स्थापिलेल्या मारुतीस्थानासाठीदेखील हे स्थान प्रसिद्ध आहे. रामदासस्वामींचे एक शिष्य महादजी देशपांडे यांच्या आग्रहावरून शिराळे इथे समर्थांनी 1655 साली उत्तराभिमुख वीर मारुतीची स्थापना केली. आजही देशपांडे कुलाकडे इथली व्यवस्था आहे. वीर मारुतीची मूर्ती सात फूट उंच आहे. या मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या अंगाला झरोके आहेत. रोज सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी मूर्तीवर झरोक्यामधून सूर्याची किरणे पाझरतात. हे अतिशय मनोहर दृश्य पाहण्यासारखे असते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: समर्थ रामदासांनी महाराष्ट्रात स्थापन केलेली ११ मारुती मंदिरे ‘अकरा मारुती’ म्हणून ओळखली जातात.
Ans: चाफळ (दास मारुती, प्रताप मारुती), शिंगणवाडी, माजगाव, उंब्रज, बाहे बोरगाव, मनपाडळे, शहापूर, मसूर, बत्तीस शिराळे आणि पारगाव ही प्रमुख स्थाने आहेत.
Ans: या स्थळांना भेट दिल्याने भक्ती, शक्ती आणि आत्मविश्वास वाढतो तसेच महाराष्ट्राच्या इतिहासाशी जोडले जाण्याचा अनुभव मिळतो.