
फोटो सौजन्य- pinterest
एकविरा आई पालुखी गं.. पालखी कार्ले डोंगरावर.. अशी असंख्य कोळी गीते ठाणे, रायगड, पालघर परिसरातील आगरी कोळी समाजात ऐकण्यास मिळतील. यावरूनच या समाजात एकविरा आईप्रति किती श्रद्धा असेल याची प्रचिती येते. आज दि. २५ मार्च चैत्र महिन्यातील एकविरा आई पालखी सोहळा कार्ले डोंगरावर उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित्ताने एकविरा आई विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया.
महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे प्रमुख मानली जातात; त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुकामातेचा अवतार म्हणजे एकविरा देवी होय. एकविरा देवी ही रेणुका मातेचा अंश आहे. तर रेणुका माता म्हणजे साक्षात आदिशक्ती पार्वती देवी होय. वेहरगाव-कार्ला गडावरील आई एकविरा देवी ही आदिशक्ती असून एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे. एकविरा आई ही एक हिंदू देवता आहे. भारत आणि नेपाळ या देशांच्या निरनिराळ्या भागांमध्ये अमर ऋषी परशुरामांची आई म्हणून एकविरा देवीची रेणुका या नावाने देखील उपासना केली जाते. एकविरा आईचे मुळरूप रेणुका माता आहे आणि तिचे पूर्ण स्वरूप विरारच्या डोंगरावर असलेली जिवदानी देवी आहे. जीवदानी देवीला महावीरा देवी असे म्हणतात. त्यामुळे एकविरा मातेची मोठी बहीण जीवदानी देवी मानली जाते. तर बारोंडा देवी ही छोटी बहीण आणि इतर अवतार जोगेश्वरी देवी (योगेश्वरी देवी), यल्लमा, यमाई, तुळजाभवानी, येडेश्वरी या बहिणी मानल्या जातात. एकविरा आईचे मंदिर पुण्यातील लोणावळा परिसरातील कार्ला गडावर आहे. नवरात्र आणि चैत्र नवरात्रमध्ये येथे मोठा उत्सव होतो. चैत्र नवरात्रीमधील पालखी सोहळा तर खूप मोठा होतो. तर वर्षभरातही देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने जात असतात.
एकवीरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्यांजवळ आहे. प्रामुख्याने आगरी-कोळी समाजाचे लोक येथे देवीच्या पूजेसाठी येतात. पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकविरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजांतील लोकांकडून विशेषतः सीकेपी आणि दैवज्ञ ब्राह्मण यांच्याकडूनही केली जाते. तसेच काही कुणबी समाजाच्या लोकांचेही हे कुलदैवत आहे. या मंदिर-संकुलामध्ये एकसारख्या बांधणीची आणि एका ओळीत बांधली गेलेली मूळची तीन मंदिरे असून ती सर्व पश्चिमाभिमुख होती. यापैकी मधले आणि दक्षिणेचे मंदिर पूर्णतः सुस्थितीत असून इतर बांधकामे केवळ नकाशावरच नाममात्र अस्तित्वात आहेत, असे या मंदिराच्या वास्तूचा आढावा घेताना लक्षात येते. या तिन्ही देवळांच्या समोरच महामंडप, वर्षामंडप आणि गोपूर आहेत आणि ही तिन्ही मंदिरे मुख्य देवतेच्या परिवारातील सोळा सदस्य देवतांच्या मंदिरांनी वेढलेली आहेत. अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करतात. या मंदिरामध्ये पशुबळी देखील देण्याचा रिवाज आहे. बकरी/ कोंबडी यांसह इतरही काही प्राण्यांचे बळी इथे दिले जातात. या देवीकडे चमत्कारी शक्ती आहेत, अशी भाविकांची मान्यता आहे.
पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते. एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकविरा देवी प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला. पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली की, पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे. पांडवांनीही हे मंदिर एका रात्री बांधून दाखविले. त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही, असा वरही तिने पांडवांना दिला.
चैत्र नवरात्रीमधील पालखीचा मान आजूबाजूला परिसरात कोळीआगरी समाजाकडे असतो. हा समाज भक्तीभावाने देवी आराधना करतो. देवी नवसाला पावते. तसेच भक्तांच्या हाकेला धावून येणारी देवी म्हणून आगरी कोळी समाजाची मोठी देवीवर श्रद्धा आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात कोळीआगरी समाज पालखीचा मान मिळावा म्हणून आग्रही असतो. यावर्षी २०२६चा मान पनवेल कोळीवाड्याला मिळाला आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: हा सोहळा प्रामुख्याने चैत्र नवरात्रीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, विशेषतः सातव्या दिवशी मोठी गर्दी होते.
Ans: देवीची सजवलेली पालखी, ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा ,“एकविरा आई”च्या जयघोषाने दुमदुमलेला परिसर
Ans: नवस पूर्ण होतात अशी श्रद्धा, संकटांपासून मुक्ती मिळते, घरात सुख-शांती येते, सकारात्मक ऊर्जा वाढते