
फोटो सौजन्य- pinterest
रामायण म्हटले की, आपल्या समोर उभ्या राहतात, त्या अनेक दिव्योत्तम, तपस्वी, त्यागी व कर्तव्यनिष्ठ अशा अनेकविध आदर्श प्रतिमा. रामायण म्हणजेच श्रीरामाचा त्यागी जीवनप्रवास. एक प्रकारची ही कर्तव्यनिष्ठेची वाटचाल. वनवासाच्या मार्गावर श्रीरामांना अनेक प्रवासी भेटतात. त्यातीलच एक महत्त्वपूर्ण प्रतिमा सर्वांसमोर उभी राहते, ती म्हणजे वीर हनुमंताची! वानर जातीमध्ये जन्मलेले, पण विविध ज्ञानसंपदेने व शौर्यगुणांनी परिपूर्ण असलेले हनुमंताचे उदात्त चरित्र लाखो वर्षांनंतर आजही तितकेच प्रेरणादायी आहे. म्हणूनच तर प्रभू श्रीरामांच्या ‘रामनवमी’जन्मोत्सवानंतर आम्ही तितक्याच उत्साहाने हनुमान जयंतीदेखील साजरी करतो. हनुमानाच्या भक्तीत नाहून निघतो.
रामायणात हनुमानाचे चरित्र अगदी अतिशय शोभून दिसते. त्यांच्या समग्र जीवनावर प्रकाश टाकला तर आपणांस असे दिसून येते की, हनुमंताचे जीवनचरित्र हे जाज्ज्वल्य, सत्कर्मशील, सद्गुणसंपन्न आणि श्रीरामभक्तीने पावन झाले आहे.
वीरवर हनुमंतांचे प्रभू श्रीरामांशी असलेले बंध म्हणजे खर्या अर्थाने दोन दिव्य शक्तींचे संमीलन. या दोघांचे एकत्र येणे म्हणजे खूपच मोठ्या पुण्याईचा महायोग. या दोघांच्या पावन भेटीमुळे रामायणाचा इतिहास घडतो.
जर का वीर हनुमंताची रामाशी भेट झाली नसती, तर कदाचित सीतेला शोधणेदेखील कठीण झाले असते. हनुमंताच्या भेटीनंतरच सुग्रीव आणि त्यांची शौर्यशाली वानरसेना हे रामाच्या मदतीला धावून येते. सेतुनिर्मितीचे कार्यदेखील नळ-नीळ यांसारख्या स्थापत्यविशारदांमुळेच शक्य होते. हनुमंताचे शौर्य आणि विश्वास किती मोठा पाहा! सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेला कोण जाईल? हा प्रश्न जेव्हा समोर आला, तेव्हा जांबुवंताने हनुमंताला लंकेला जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. रामालाही विश्वास होता की, सीतेला शोधण्याचे कार्य हनुमंतच करू शकेल. म्हणूनच त्यांनी सीतेला ओळख पटण्यासाठी म्हणून रामाचे नाव कोरलेली एक सोन्याची अंगठी हनुमंताकडे सुपूर्द केली. यावरून रामाचा हनुमंतावरील प्रगाढ विश्वास दिसून येतो. हनुमान मंद्राचल पर्वतावरून उड्डाण घेऊन लंकेकडे प्रस्थान करतात. सीतेचा शोध घेऊन रामाने दिलेली मुद्रा सीतेला अर्पण करतात. तेव्हा सीतेच्या लक्षात येते की, हनुमान हे आपल्या पतीचे दूत व परमभक्त अनुयायी आहेत. तेव्हापासून सीता या मातृस्वरूपा आहेत, अशीच भावना हनुमंताच्या मनात राहते ती शेवटपर्यंत!
श्रीराम आणि हनुमान यांच्यातील बंध वाढीस लागण्याचे कारण म्हणजे, या दोघांत विद्यमान असलेले सर्वश्रेष्ठ गुण. श्रीराम हे दिव्यत्वाचे मूर्तिमंत प्रतीक असल्यामुळेच हनुमंतांची दास्यवृत्ती त्यांच्याकडे वळण्यास व त्यांचा परमभक्त होण्यास प्रवृत्त करते. स्वतःचे प्राण गेले, तरी बेहत्तर, पण श्रीरामांसारखे दिव्य महापुरुष या धरणीवर विद्यमान असलेच पाहिजे. यासाठीच त्यांना सर्व प्रकारच्या दुःखापासून दूर ठेवणे आणि सदैव त्यांच्या हिताचे रक्षण करणे यासाठी हनुमंताने आपले जीवन समर्पित केले.
पुढे राम-रावण युद्धामध्ये रावणाच्या दिव्यास्त्रामुळे लक्ष्मण मूर्च्छित होतो. त्यावेळी वैद्य सुषेणच्या सांगण्यावरून हिमालय परिसरातील द्रोणागिरी पर्वतावरून संजीवनी औषधी वनस्पती आणण्याचे जोखमीचे कार्य हनुमंताने केले. दिव्यऔषधी वनस्पती घेऊन परतत असताना वाटेत भरताची भेट होते. त्यावेळी भरताची आतिथ्य स्वीकारण्याची विनंती हनुमंताने मान्य केली नाही. कारण, लक्ष्मणाच्या उपचारासाठी लवकरात लवकर पोहोचणे आवश्यक असते. यावरून कार्याविषयीची तीव्रता व काळजी लक्षात येते.
असे एक नव्हे तर असंख्य प्रसंग आहेत की, आपणांस राम आणि हनुमंताचे पवित्र ऋणानुबंध दृढ होत गेल्याचे दृष्टीस पडतात. पुढे अयोध्येत पोहोचल्यानंतरही हनुमंताने रामाच्या आज्ञेत राहून आपले सारे आयुष्य श्रीरामसेवेतच खर्ची घातले आहे. हनुमंताच्या हृदयात श्रीरामाविषयी पिता, गुरू किंवा देवत्वाचा भाव दडलेला आहे. किती मोठी ही उदात्त नि:स्वार्थ भावना! प्रभू श्रीराम आणि हनुमान यांच्यातील हे उदात्त व पवित्र ऋणानुबंध व्यक्ती, कुटुंब, समाज, देश व समग्र विश्वामध्ये शाश्वत सुख व आनंद निर्माण करण्यासाठी आजही तितकेच लाखमोलाचे ठरतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: हनुमान हे श्रीरामांचे परमभक्त आणि सेवक होते. त्यांचे नाते निस्वार्थ भक्ती, विश्वास आणि समर्पणावर आधारित होते.
Ans: कारण या नात्यात शक्ती (हनुमान) आणि धर्म-नीती (राम) यांचा अद्वितीय संगम दिसतो.
Ans: विश्वास, कर्तव्यनिष्ठा आणि निस्वार्थ सेवा हे जीवनात यश मिळवण्यासाठी आवश्यक आहेत